Bonding of Pawar Family will Maharashtra’s benefits : प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर विदर्भातील आणखी एका नेत्याचे विधान
Nagpur Pawar Family पवार कुटुंब एक येणं फायद्याचे आहे, असं विधान काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं. यापूर्वी इतर नेत्यांनी देखील विधानसभा व लोकसभा निवडणुकीपूर्वी यावर भाष्य केलं आहे. कधी अजित पवार यांच्या, तर कधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने यावर मत मांडलं आहे. आता धर्मरावबाबा आत्राम यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशी चर्चा रंगत आहे. अशातच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार व अजित पवार या काका पुतण्यात दिलजमाई व्हावी व त्यांनी परत एकत्र यावे. यातच महाराष्ट्राचे हित आहे, अशी भूमिका आत्राम यांनी मांडली.
सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना वगळून इतर खासदारांनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केल्याची चर्चा रंगत आहे. याबाबत अद्याप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृत भाष्य करण्यात आलं नाही. तरी सोनिया दुहान यांनी आमच्यातील काही खासदारांना संपर्क केल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी दिली आहे.
यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांनी सूचक भूमिका मांडली आहे. विधानसभेला संघाकडून करण्यात आलेल्या प्रचाराचे पवारांनी एका बैठकीदरम्यान कौतुक केल्याचे वृत्त कानी आले. ते नेमके काय बोलले याची कल्पना नाही. मात्र जर ते असे बोलले असतील तर मोठी बाब आहे.
शरद पवारांचे खासदार-आमदार एकत्रित आले तर चांगलेच आहे. शरद पवार व अजित पवार एकत्रित यावे, असे आम्हाला वाटतच आहे. असे झाले तरच राजकारण मजबूत होईल व महाराष्ट्राचे हित साधल्या जाईल, असे आत्राम म्हणाले.