Bad Roads : तिन किलोमीटरसाठी मारावा लागतो १८ किलोमीटरचा फेरा !

Problem of the people of Borgaon Kalandri in Umred taluka of Nagpur district : विद्यार्थ्यांना पक्क्या रस्त्याअभावी अर्धवट सोडावे लागले शिक्षण

Nagpur : सरकार ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरवण्याचे दावे करत असले, तरी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील बोरगांव कलांद्री ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या कोलारमेट गावातील लोकांना ग्रामपंचायत मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी १७ ते १८ किमीचा लांबचा वळसा घ्यावा लागतो. पक्क्या रस्त्याअभावी ग्रामस्थांना दाट जंगलातील कच्च्या मार्गावरून आणि जंगली जनावरांच्या हल्ल्याचा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. ज्यामुळे त्यांना शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो.

कोलारमेट ते बोरगांव कलांद्री ग्रामपंचायत मुख्यालयापर्यंतचे अंतर अवघे ३ किमी आहे. मात्र, पक्क्या रस्त्याअभावी ग्रामस्थांना भिवापूर हेटीमार्गे उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वेलसाखरा २२ मैल चौकातून १७ ते १८ किमीचा प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात कच्च्या मार्गावर चिखल साचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद होतो, ज्यामुळे ग्रामस्थांना लांबचा वळसा घ्यावा लागतो. या समस्येच्या निराकरणासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

Adivasi Pardhi Development Council : आदिवासी विभागाच्या हलगर्जीपणामुळे पारधी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास !

इंदिरा गांधी विद्या मंदिर, बोरगांव कलांद्री येथे कोलारमेटचे विद्यार्थी दहावीपर्यंत शिक्षणासाठी दररोज जंगलातून प्रवास करतात. या जंगलात ८ ते १० वाघांचा संचार आहे. जंगलात वाघाच्या हल्ल्याचा धोका आहे. गेल्या आठ वर्षांपासून अनेक मुलींनी शाळेतून नावे काढली आहेत, तर काही विद्यार्थ्यांना पक्क्या रस्त्याअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. कोलारमेटमधील जिल्हा परिषद शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे, परंतु पुढील शिक्षणासाठी चांपा किंवा उमरेडला जावे लागते. मात्र, पुरेशा वाहतूक साधनांअभावी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागते. रेशन, ग्रामपंचायत प्रमाणपत्र आणि इतर कामांसाठीही ग्रामस्थांना १८ किमीचा वळसा घालावा लागतो.

चांप्याचे माजी सरपंच अतिश पवार यांनी कोलारमेट ते भिवापूर हेटी मार्गे तात्काळ बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी तहसीलदार मनोहर चव्हाण आणि उमरेड आगार प्रमुख कोकीळा कटरे यांना निवेदन सादर केले आहे. पवार यांनी सांगितले की, कोलारमेट गावातील ग्रामस्थांना रेशनसाठी १८ किमीचा प्रवास करावा लागतो. तसेच, उटी भिवापूर बस स्टॉपपर्यंत आठ किमी अंतर कुठल्याही वाहतूक साधनांशिवाय पायी चालत जावे लागते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाघाच्या दहशतीतून प्रवास करावा लागतो. जर ३ किमीचा डांबरी रस्ता आणि बस सेवा उपलब्ध झाली, तर ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल.

“जर ३ किमीचा डांबरी रस्ता झाला, तर रेशन आणि ग्रामपंचायत प्रमाणपत्रासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. यामुळे सर्वसामान्यांना मोठी सोय होईल.”
– धम्मपाल मेश्राम, पुलिस पाटील, कोलारमेट

“कच्च्या जंगलमार्गावरून ग्रामपंचायत मुख्यालयापर्यंत १८ किमीचा प्रवास करावा लागतो. रस्ता झाल्यास वेळेची बचत होईल.”
– राहुल रंगारी, रहिवासी, कोलारमेट

BEST Election ; ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि उत्तर शून्यच…

कोलारमेट ग्रामस्थांच्या समस्येसंदर्भात बोरगांव कलांद्री ग्रामपंचायतीमार्फत उमरेडचे आमदार, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जंगलातील चार किमीच्या पक्क्या डांबरी रस्त्याच्या बांधकामाची मागणी करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे कोलारमेट आणि बोरगांव कलांद्री या दोन्ही गावांतील ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी सोय होईल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल.
– गुनीता सराटे, ग्रामपंचायत सदस्य, बोरगांव कलांद्री