Project affected people warn of protest : मोबदला न मिळाल्यास २४ डिसेंबरला मनसेचे ‘जलसमाधी आंदोलन’
Nandura : जिगाव प्रकल्पामुळे पूर्णतः बाधित झालेल्या रोटी गावातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मोबदला न मिळाल्याने संताप उफाळला आहे. शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून निर्णय मात्र लांबणीवर टाकला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नांदुरा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना निवेदन सादर केले.
निवेदनात स्पष्ट आरोप करण्यात आला आहे की—
रोटी गावातील संपूर्ण शेती जिगाव प्रकल्पासाठी बुडीत गेली असून, सर्व सरकारी प्रक्रिया जवळपास पूर्ण असूनही शेतकऱ्यांना आजतागायत एक रुपयाचाही मोबदला मिळालेला नाही. वारंवार बैठक, विनंती, पाठपुरावा करूनही प्रशासन हलत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.
Jain Muni vs Raj Thackeray : तुम्ही चालू करा मग आम्ही पण चालू करू
मनसेचा इशारा : २४ डिसेंबरला धरणात बसून ‘जलसमाधी आंदोलन’
मोबदल्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही, तर २४ डिसेंबर रोजी मनसे व गावकरी मिळून धरणातील पाण्यात बसून जलसमाधी आंदोलन करतील, असा तीव्र इशारा निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनावर तातडीची कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.
आंदोलनात मनसे पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांची मोठी उपस्थिती
निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष उगले, शहराध्यक्ष सागर जगदाळे, शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे, अमोल करुटले, उल्हासराव काटे, सचिन नेमाडे, प्रकाश घुळे, तुकाराम घुळे, मोहन काटे, भास्कर घुळे तसेच रोटी गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.








