Shivsena’s march for crop insurance and loan waiver : सरकारला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Jalgao Jamod शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा, संपूर्ण कर्जमाफी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना भरपाई यांसह विविध मागण्यांसाठी तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यात शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून सरकारने निवडणुकीत दिलेली कर्जमाफीची आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने खर्चाचा ताळमेळ बसत नाही, कर्जाचा बोजा वाढतो आहे आणि त्यामुळे आत्महत्यांचा धोका अधिक वाढला आहे, असे निवेदनात नमूद आहे.
यावेळी २०२३-२४ चा रब्बी हंगामाचा पीकविमा तसेच २०२४-२५ चा विमा तत्काळ मंजूर करण्याची मागणी झाली. तसेच ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, फळबाग उत्पादकांना अनुदान द्यावे आणि पूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या पुढे मांडण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना उग्र आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला.
या मोर्चात जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मुश्ताक भाई यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले.








