Farmers Have Been Without Electricity Connection for 4 Years : किसान काँग्रेस कार्याध्यक्ष कैलास साबे यांचा आत्मदहनाचा इशारा
Khamgao चिखली, सुजातपूर आणि आमसरी येथील शेतकऱ्यांना मागील चार वर्षांपासून शेतासाठी वीज कनेक्शन न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. अर्ज करूनही महावितरण विभागाकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या अन्यायाविरोधात किसान काँग्रेस खामगावचे कार्याध्यक्ष कैलास साबे यांनी सात दिवसांत वीज कनेक्शन न दिल्यास संबंधित सबस्टेशनसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात महावितरण कार्यालय नांदुरा येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, चिखली, सुजातपूर व आमसरी येथील शेतकऱ्यांनी ३-४ वर्षांपूर्वी वीज जोडणीसाठी अर्ज केले असून, आजपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, श्रीकृष्ण दामोदर यांनी वैयक्तिकरित्या अनेक वेळा कार्यालयीन दार ठोठावले, मात्र फक्त आश्वासनांवरच काम भागविण्यात आले.
महावितरण विभागाकडून ‘तार आणि पोल उपलब्ध नाहीत’ अशा कारणावरून शेतकऱ्यांना दरवर्षी थांबविण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सुविधा मिळत नाही आणि पिकांचे उत्पादन घटले आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे.
यावेळी किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष कैलास साबे, भगवान बावस्कार, श्रीकृष्ण दामोदर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की — “जर सात दिवसांत वीज जोडणी न झाल्यास आम्ही सबस्टेशनसमोर आत्मदहन करू आणि त्याची पूर्ण जबाबदारी महावितरण विभागाची असेल.”
काँग्रेसच्या किसान आघाडीने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या या प्रश्नामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








