Ramesh Chennithala; Congress announces statewide protest : रमेश चेन्नीथला; काँग्रेसकडून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
Mumbai : राज्यातील शेतकरी, ‘लाडकी बहीण’ योजना लाभार्थी आणि बेरोजगार युवकांची घोर फसवणूक केल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महायुती सरकारवर केला आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, काँग्रेस पक्ष आता रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन, मोर्चे आणि जनजागरण मोहिमा राबवून जनतेच्या हक्कासाठी लढेल.
मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या बैठकीनंतर चेन्नीथला माध्यमांशी बोलत होते. या बैठकीत काँग्रेसच्या आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरविण्यात आली. बैठकीस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेते उपस्थित होते.
रमेश चेन्नीथला म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत देण्याऐवजी सरकारने जुन्या योजनांचे केवळ एकत्रीकरण करून फसवे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार गप्प बसले आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले गेले होते, पण अद्याप त्या लाभार्थ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. बेरोजगार युवकांसाठीही कोणते ठोस उपाय करण्यात आलेले नाहीत.”
ते पुढे म्हणाले, “सरकार फक्त घोषणा करत आहे, पण अंमलबजावणी शून्य आहे. महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी संकट या तिन्ही आघाड्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. काँग्रेस पक्ष आता मौन धरणार नाही. राज्यभर आंदोलन, मोर्चे आणि जनजागरण मोहिमा घेऊन जनतेच्या न्यायासाठी लढा उभारण्यात येईल.”
या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे, खासदार वर्षाताई गायकवाड, बी. एम. संदीप, यूबी व्यंकटेश, पृथ्वीराज साठे, रवींद्र दळवी, आमदार अमिन पटेल, खासदार डॉ. कल्याण काळे, तसेच प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, मोहन जोशी, वजाहत मिर्झा, सिद्धार्थ हत्ती अंबीरे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि इंटक अध्यक्ष कैलाश कदम उपस्थित होते.
Funds for MLA : सत्ताधाऱ्यांच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींची ‘खिरापत’
या बैठकीत काँग्रेसने स्पष्ट केले की, “राज्य सरकारकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. शेतकऱ्यांचा आणि बेरोजगार युवकांचा आवाज आता गप्प बसणार नाही.” काँग्रेसच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
____