khamgao-jalna-railway-route-follow-up-demand-mla-shweta-mahale : रेल्वे लोकआंदोलन समितीनेचा लोकप्रतिनिधींना सवाल
Chikhli बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देऊ शकणाऱ्या खामगाव जालना रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळावी यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे अधिक जोरकस पाठपुरावा करावा, अशी मागणी रेल्वे लोकआंदोलन समितीने केली आहे. या संदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार महाले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मराठवाडा आणि विदर्भाला थेट जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रेल्वेमार्गाचा विषय सध्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. तीन महिन्यांपूर्वी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र अलीकडे सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गाबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने पुन्हा एकदा निराशा पसरली आहे.
हा प्रस्तावित रेल्वेमार्ग सुमारे १६२ किमी लांबीचा असून त्यासाठी जवळपास ४,९०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने एकूण खर्चाच्या ५० टक्के वाटा उचलण्यासही मंजुरी दिली आहे, तर उर्वरित निधी केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सदस्यांनी जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडेही पाठपुराव्याबाबत वारंवार विचारणा केली. मात्र अद्याप ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याचे समितीने नमूद केले आहे.
दरम्यान, समितीचे सदस्य डॉ. किशोर वळसे आणि रेणुकादास मुळे यांनी ८ मार्च रोजी आमदार महाले यांची भेट घेऊन निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, तसेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा वाढवू, अशी ग्वाही आमदारांनी दिल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
Rajya sabha election : सातही उमेदवारांची निवड निश्चित, राज्यसभा निवडणूक बिनविरोध!
समितीच्या मते, हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भ-मराठवाडा भागातील व्यापार, उद्योग, कृषी बाजारपेठ आणि प्रवासी वाहतूक यांना मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.








