Don’t question the political careers of ‘those’ two : आम्ही फोडाफाडीचे राजकारण करत नाही, भाजपची ही पद्धत नाही
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, चर्चा काहीही सुरू असल्या तरी जयंत पाटील किंवा भास्कर जाधव यांपैकी कुणीही आम्हाला संपर्क केलेला नाही. विनाकारण त्यांच्या राजकीय आयुष्याबद्दल प्रश्नचिन्ह लावू नका. आम्ही फोडाफाडीचे राजकारण करत नाही. भाजपची ही पद्धत नाही. विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेतलाय. त्या पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार आहे.
भाजपच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी अनेक लोक पक्ष प्रवेश करतात. ‘आमच्या पक्षात या’, असं कधीही आम्ही कुणाला म्हणत नाही. ज्यांना वाटते भाजपमध्ये प्रवेश केला पाहिजे, त्या लोकांचं आम्ही स्वागत करतो, असे मंत्री बावनकुळे म्हणाले. नागरिकांचे प्रश्न मोठे आहेत. महायुतीचे आणि भाजपचे मंत्री संपर्क मंत्री त्या त्या जिल्ह्यांत जाऊन जनतेच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, असेही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारले असता, महायुतीतमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाची चाचपणी केली पाहिजे. आमची महायुती अत्यंत मजबूत आहे. आपापला पक्ष वाढवून इतर स्पेस घेण्याचा प्रयत्न आहे. हे आमचं काम आहे. एक कोटी 50 लाख प्राथमिक सदस्य करत आहोत. तीन लाख लोकांना सक्रिय सदस्य करत आहोत. आम्ही महायुती म्हणून विधानसभा लढली लोकसभाही लढली. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचा विचार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.