Suicide of ‘NEET’ student in Akola : नातेवाईक म्हणतात, पोलिसांनी आणले दडपण
Akola अकोल्यात ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पण कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केल्यामुळे घटनेने वेगळेच वळण घेतले आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यावर दडपण आणल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
प्रसन्न वानखडे (राहणार बेलगाव, मेहकर, जिल्हा बुलढाणा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अकोल्यातील आकाशवाणी परिसरातील जलाराम सोसायटीत भाड्याच्या खोलीत राहत होता. याच खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गेल्या महिन्यात एका विद्यार्थ्यासोबत झालेल्या वादानंतर प्रसन्न वानखडेवर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुटुंबीयांच्या मते, पोलिसांनी या प्रकरणात विद्यार्थ्यावर मानसिक दबाव टाकला. जमादार रमेश खंडारे यांनी प्रकरण मिटवण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली, असा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याने तपास सुरू केला आहे. जर दोषी आढळले, तर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मात्र, या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Crime in Hinganghat : इंस्टाग्रामवर पोस्ट केली; थेट खूनच केला!
आत्महत्येचे नेमके कारण काय?
पोलिसांनी दडपण आणल्यामुळे मानसिक अवस्था बिघडली. त्यातच टेंशनमध्ये आमच्या मुलाने आत्महत्या केली, असा दावा कुटुंबियांनी केला आहे. पण प्रवीणच्या आत्महत्येचे हेच खरे कारण आहे का, याबबात अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. शैक्षणिक, आर्थिक कारणे आहेत का, याचाही पोलीस तपास करीत आहेत.