13 crore funds of 2.76 lakh beneficiaries pending at Government : सरकारने झुलवत ठेवले; २.७६ लाख लाभार्थ्यांचा १३ कोटी निधी कुठे?
Amravati शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सरकारने २.७६ लाख लाभार्थ्यांना ना रेशन दिले, ना आर्थिक मदत दिले. डिसेंबर २०२३ पर्यंत ७४,३७२ रेशनकार्डधारकांना फक्त १२.२३ कोटींचा लाभ मिळाला. मात्र, त्यानंतर वर्षभर हा निधी थांबला असून १३ कोटींची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. “लाडक्या बहिणीला” मदतीचा वर्षाव करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर का पडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत एपीएल केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ पुरवले जात होते. मात्र, भारतीय अन्न महामंडळाने पुरवठा थांबवल्यानंतर सरकारने रोख रक्कम हस्तांतरणाचा निर्णय घेतला. एप्रिल २०२४ पासून लाभ वाढवून १५० ऐवजी १७० रुपये प्रतिलाभार्थी करण्यात आले, पण आतापर्यंत ती रक्कम मिळालेली नाही! सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
एकूण ७४,३७२ रेशनकार्डधारक आहेत. त्यात २,८६,७०७ कुटुंबातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. यातील १२.२३ कोटी मिळालेले असून १३ कोटी रुपये प्रलंबित आहेत. पश्चिम विदर्भातील सहा आणि औरंगाबाद विभागातील आठ अशा १४ जिल्ह्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. शेतकरी कुटुंबांना पैसे देण्याचा निर्णय जाहीर झाला, पण प्रत्यक्षात पैसे मिळालेच नाहीत! त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत आणि सरकारकडून उत्तराची मागणी करत आहेत.








