Government’s big step to prevent child marriage : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर होणार विशेष ग्रामसभा
Mumbai : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उद्या (८ मार्च) राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संपल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश ६ मार्च २०२५ रोजीच्या पत्रान्वये दिले आहेत.
याबाबत बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत. महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. असे असतानाही विधवांना रुढी व अंधश्रद्धेमुळे जाचक प्रथांना सामोरे जावे लागते आहे. यासोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी. यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात याव्या.
गावात बालविवाह होऊ न देणे, पतीच्या निधनानंतर महिलांना जाचक असणाऱ्या प्रथा बंद करणे, गावात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी प्रयत्न करणे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे, असे ठराव करण्याची आयोगाची संकल्पना आहे. संपूर्ण गावांत असे ठराव शासकीय पातळीवर झाल्यास जनसामान्यांच्या मनात महिलांना सन्मानाने वागवण्याची कर्तव्य भावना रुजवता येईल.
महिलांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही अशा प्रयत्नांतून बदलेल. म्हणून आयोगाने ही संकल्पना मांडल्याचे त्यांनी सांगितले. विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आभार मानले आहेत. राज्यात पहिल्यांदाच महिलांच्या विषयांकरिता विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा मैलाचा दगड असल्याचेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाने २८ फेब्रुवारी २०२५ रोजी याबाबत कार्यवाही करण्याकरिता ग्रामविकास विभागाला पत्राद्वारे कळविले होते. तसेच केंद्र शासनाच्या पंचायती राज विभागाच्या अपर सचिवांनी देशाच्या सर्व राज्यांतील ग्रामविकास सचिवांना २१ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रान्वये जागतिक महिला दिनानिमित्त महिला सभा आयोजित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.