delhi-air-ambulance-crash-seven-dead-chatra-jharkhand : सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, संपर्क तुटल्यानंतर शोधमोहीम वेगाने सुरू
New Delhi : रांची येथून दिल्लीकडे निघालेल्या एअर अँब्युलन्सचा झारखंडमध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चालक दलातील सदस्यांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त विमान दिल्लीकडे जात असताना संपर्क तुटला आणि त्यानंतर काही वेळातच ते चतरा जिल्हा परिसरात कोसळल्याचे स्पष्ट झाले.
ही एअर अँब्युलन्स सेवा रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून चालवली जात होती. 23 फेब्रुवारी रोजी बीचक्राफ्ट C90 प्रकारचे VT-AJV नोंदणी असलेले हे विमान रांची–दिल्ली मार्गावर वैद्यकीय आपत्कालीन उड्डाण करत होते. सायंकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी विमानाने बिरसा मुंडा विमानतळ येथून उड्डाण केले. प्रारंभी सर्व प्रक्रिया नियमित असल्याचे सांगण्यात आले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीए यांनी या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यांच्या माहितीनुसार, उड्डाणानंतर काही वेळातच विमानाने कोलकाता एटीसीशी संपर्क साधला होता. मात्र सायंकाळी 7 वाजून 34 मिनिटांच्या सुमारास वाराणसीच्या दक्षिण-पूर्व भागात असताना रडार आणि रेडिओ संपर्क अचानक तुटला. त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही. संपर्क तुटल्यानंतर परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित यंत्रणा सतर्क करण्यात आली.
Akola Municipal Corporation : महापौरांचा पहिला दणका, अतिक्रमण हटवण्याचे निर्देश
वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माहितीनुसार, विमान त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर प्रतिसाद देत नव्हते. पायलटची शेवटची संवाद नोंद कोलकाता क्षेत्रातील एटीसीशी झाली होती. संपर्क तुटल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने, रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर सक्रिय करण्यात आले आणि शोध व बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले.
दरम्यान, चतरा जिल्ह्यातील सिमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासियातू करमटांड जंगल परिसरात संशयित धातूचा मलबा आढळून आला. स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मलब्यात प्रोपेलर आणि इंजिनचे काही अवशेष दिसून आल्याची माहिती आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा मलबा अपघातग्रस्त एअर अँब्युलन्सचाच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर विमान अपघात तपास यंत्रणेची टीम घटनास्थळी दाखल झाली असून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात येणार आहे. हवामान स्थिती, तांत्रिक बिघाड किंवा इतर कोणतेही संभाव्य कारण याबाबत अधिकृत अहवाल आल्यानंतरच स्पष्टता येणार आहे.
DPC Amravati : ना निवडणूक झाली, ना निवड; डीपीसीचे भिजत घोंगडे
या दुर्दैवी घटनेमुळे वैद्यकीय आपत्कालीन सेवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एअर अँब्युलन्स सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून राज्य प्रशासनाकडून मदत आणि पुढील कार्यवाहीबाबत हालचाली सुरू आहेत. अधिकृत तपास अहवालाची प्रतीक्षा असून संपूर्ण देशातून या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.








