NCP-mlas-met-sunetra-pawar-over-ajit pawar-plane-crash-issue : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मांडली व्यथा, बारामतीत घेतली भेट
Pune राज्यातील सत्तासमीकरणांच्या केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थतेचे वारे वाहत असून, आमदारांमध्ये प्रचंड मानसिक दुविधा निर्माण झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पक्षातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे.
हा अपघात होता की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राष्ट्रवादीच्या सुमारे २० आमदारांनी बारामती येथे सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपल्या मनातील शंका आणि चिंता व्यक्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Rajya sabha election : शरद पवारांमुळेच प्रियंका चतुर्वेदींना डच्चू; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत आमदारांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “दादांचा खरोखर अपघात झाला की त्यामागे काही वेगळे षडयंत्र होते?” असा थेट प्रश्न काही आमदारांनी विचारल्याचे सूत्रांकडून समजते.
प्राथमिक तपास अहवालातील विसंगतींबाबतही यावेळी गांभीर्याने चर्चा करण्यात आली. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, जेणेकरून कार्यकर्त्यांच्या मनातील सर्व शंका दूर होतील, अशी मागणी आमदारांनी लावून धरली आहे. सुनेत्रा पवार यांनी सर्वांच्या भावना ऐकून घेत त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आणि तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Anandrao Adsul : दोन वर्षांत दहा राज्यपाल झाले, पण माझा नंबर कधी लागेल?
दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी अक्षरशः रान उठवले आहे. या दुर्घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल व्हावा, यासाठी रोहित पवार आग्रही आहेत. रोहित पवारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे सरकारवरील दबाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर, आता राष्ट्रवादीचे नाराज आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. अजित पवार यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या अपघाताबाबत पक्षांतर्गतच संशयाची पाल चुकचुकत असल्याने गृहमंत्री म्हणून फडणवीस आता कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जर तपासाबाबत अधिक गंभीर मागण्या पुढे आल्या, तर राज्य सरकारला या प्रकरणात विशेष चौकशी समिती किंवा अन्य मोठे निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.








