DCM reacts to Raj Thackeray and Devendra Fadnavis meeting : ‘आम्हीही विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांना भेटायचो’; राज-फडणवीस भेटीबाबत विधान
Akola राज्यातील विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. आम्हीही विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांच्या भेटी घेतल्याचं अनेक वेळा घडलं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ‘यात वेगळं काय आहे?’, असंही ते म्हणाले.
अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी यासंदर्भात विधान केले. त्याचवेळी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्याची तयारीही दर्शवली. सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेईल. कोणताही प्रश्न चर्चेतून सुटतो. त्यामुळे सरकार बच्चू कडू यांच्याशी संवाद साधण्यास तयार आहे. शासन आणि प्रशासन त्यांच्याशी नियमित संपर्कात आहे, असंही ते म्हणाले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा पुढाकार अन् चंद्रपूर होणार Honey Hub!
अजित पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपन्या व दुकानदारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. बियाणे व खतांच्या विक्रीसाठी बेकायदेशीर लिंकिंग करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द केले जातील. संबंधित कंपन्यांच्या संदर्भात कठोर उपाययोजना केली जाईल.’ शासन शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देईल आणि त्यांना दिलासा देईल. एवढेच नव्हे, तर महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यासही सरकार वचनबद्ध आहे, असंही ते म्हणाले.
मालेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. ‘सहकार क्षेत्रातील निवडणुका पक्षांच्या चिन्हांवर होत नाहीत. यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन निवडणूक लढवताना दिसले आहेत,’ असं ते म्हणाले.