Government positive to implement new labor laws : कामगार हिताची पूर्ण काळजी घेणार
Mumbai : नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची काळजी घेण्यात येईल. भारतीय मजदूर संघाने घेतलेल्या हरकतींचाही पूर्ण विचार केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले.
भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने नवीन लेबर कोड आणि बी.एम.एस. या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगिर, अखिल भारतीय उपाध्यक्ष राज बिहारी शर्मा, क्षेत्र संघटन मंत्री राजेश, ना.मे.लोखंडे, महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या संचालक रोशनी कदम – पाटील आणि प्राध्यापक पी.एम. कडूकर उपस्थित होते.
नवीन कामगार कायदे 2019 – 2020 पासून संसदेने पास केलेले आहेत. ते लागू करण्याबाबत केंद्र व राज्य सरकार विचार करत आहे. या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत भारतीय मजदूर संघाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
सेमिनारचे उद्घाटन कामगार मंत्री फुंडकर यांनी केले. ॲड. ढुमणे आणि शर्मा यांनी या कायद्यांबाबत भारतीय मजदूर संघाची भूमिका विशद केली. या निमित्ताने ॲड. ढुमणे यांनी लिहिलेल्या “नवीन लेबर कोड आणि बी.एम.एस.’ या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय श्रमशोध मंडळाच्यावतीने मंत्री फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक सुरक्षा कोड 2020 आणि वेतन कोड 2019 हे कामगार कायदे असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी लाभदायक आहेत. घरेलू, बांधकाम, अंगणवाडी, आशा सेविका, फेरीवाले, रिक्षाचालक, टॅक्सीचालक आदी असंघटित क्षेत्रातील सुमारे 50 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि संघटित – असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन हमी देणारे असल्याने ते तत्काळ लागू झाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
औद्योगिक संबंध कोड 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती कोड 2020 या कोडमधील कारखाना बंद करणे, कामगार कपात, ले ऑफ, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, स्टॅंडिंग ऑर्डर आणि कंत्राटी कामगारांशी संबंधित अनेक तरतुदी बदलून मगच ते कायदे लागू करावेत, अशी मागणी भारतीय मजदूर संघाकडून यावेळी करण्यात आली.
या सेमिनारला राज्यभरातून संरक्षण, वीज मंडळ, बँका, विमा, अनुऊर्जा, पोस्ट , मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, RCF, पोर्ट ट्रस्ट, खाजगी कारखाने, सार्वजनिक उद्योग, सहकारी बँका, शासकीय कर्मचारी, सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस, कंत्राटी कामगार, अंगणवाडी, घरेलू , बांधकाम, रिक्षाचालक, फेरीवाले, टॅक्सीचालक, बिडी, मर्चंट नेव्ही, सुरक्षा रक्षक, एअर इंडिया आदी उद्योगातील 250 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण मिलगिर यांनी तर संचालन बाळासाहेब भुजबळ यांनी केले. आभार मुंबईचे सचिव संदीप कदम यांनी मानले.