Sajid Khan demands development work of Rajarajeshwar temple : गरज पडल्यास पोलीस ठाण्याचे काम थांबवा; विधानसभेत वेधले लक्ष
Akola अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी विधानसभेत एका मुद्यावरून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. दोन धर्मांमध्ये सध्या विद्वेषाची ठिणगी पडली असताना साजिद खान यांनी आदर्श घालून दिल्याचं बोललं जात आहे. त्यांनी नवीन पोलीस ठाण्याचे काम थांबवून राजराजेश्वर मंदिराच्या विकासकामांना सुरुवात करण्याच्या सूचना सरकारला केल्या. या मागणीमुळे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं.
अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराचा विकास आराखडा तयार आहे. त्यात मंदिराच्या पार्किंगसाठी पोलिस ठाण्याची जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, सद्यःस्थितीत त्या जागेत पोलिस वेल्फेअर फंड अंतर्गत नवीन पोलिस ठाण्याचे काम सुरू आहे. हे काम तातडीने थांबवून राजराजेश्वर मंदिर विकासाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी आमदार पठाण यांनी केली.
Bill Gates : बिल गेट्स करणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत !
त्यांनी विविध विकास विषयक मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने राजराजेश्वर मंदिर विकास आराखडा, एअरपोर्ट निर्मितीबाबतची उदासीनता, परिणामी बंद पडलेले उद्योग, वाढती बेरोजगारी, अन्न पुरवठा विभागाचा बेजबाबदार कारभार, पोलिस आयुक्तालयाची गरज तसेच पोलिस विभागातील रिक्त पदे यांसारख्या विषयांचा समावेश होता. आमदार पठाण यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार टीकादेखील केली.
“राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अकोला जिल्ह्याला एअरपोर्ट Akola Airport देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात या संदर्भात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. एकेकाळी अकोला हे विविध उद्योगांसाठी ओळखले जात होते. मात्र, एअरपोर्टच्या अभावामुळे येथील उद्योगधंदे बंद पडले आणि नव्या उद्योगांची स्थापना होण्यासही अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी जिल्ह्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे,” असं ते म्हणाले.
Pravin Darekar : मुंबईतील नकली माथाडींच्या गॅंगवॉरवाल्या टोळ्यांना रोखा !
अन्न पुरवठा विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला आहे. रेशन कार्डधारकांना धान्य मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. त्याचप्रमाणे, राशन कार्ड काढण्यासाठी आठ ते दहा हजार रुपयांची मागणी केली जात आहे. मात्र कार्ड मिळाल्यावरही धान्य मिळत नाही. या सर्व गोष्टींवर अन्न पुरवठा विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं पठाण म्हणाले.
अकोल्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी पोलिस कर्मचारी संख्या मात्र अपुरी आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत आणि अकोल्याला पोलिस आयुक्तालय मंजूर करावे, अशी मागणी पठाण यांनी केली.