Breaking

Amravati Belora Airport : बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव?

Belora Airport should be given Dr. Punjabrao Deshmukh’s name : मनपा, जिल्हा परिषदेत एकमत; सर्वधर्मीय नागरिक देणार निवेदन

Amravati बेलोरा विमानतळाला डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे. तसेच विमानतळावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. या आणि अन्य मागण्यांसाठी शाहू, फुले, आंबेडकर, भाऊसाहेब देशमुख फाउंडेशन, अमरावती यांच्यातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. या मागण्यांसंदर्भात बुधवार, १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेने सर्वानुमते ठराव पारित केला आहे. हा विषय केवळ अमरावतीपुरता मर्यादित नाही. संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्र आणि देशभरातील नागरिकांची भावना आहे. डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने विमानतळाचे नामकरण करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा विचार सर्वांनी मांडला.

Vanchit Bahujan Aghadi : पाणीपट्टीच्या प्रश्नांसाठी अकोलेकर पोहोचले मुंबईत!

डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी भारतात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवले. ते देशाचे पहिले कृषिमंत्री होते. त्यांनी भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक धोरणे राबवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतात हरितक्रांतीची पायाभरणी झाली. कृषी शिक्षण व संशोधनाला त्यांनी विशेष प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत संविधान निर्मितीमध्ये ते घटक समितीचे सदस्य होते व त्यांनी संविधानाच्या मसुदा समितीत मोलाचे योगदान दिले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देणे उचित ठरेल. असे मत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

१३ जुलै २०१९ रोजी बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या वेळी तत्कालीन आमदार डॉ. सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे. विमानतळाच्या दर्शनी भागात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. या मागण्यांचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले होते. या मागण्यांवर सकारात्मक विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते.

Dr. Pankaj Bhoyar : आशा सेविकांनाही मिळणार टॅब, Technosavy करणार

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी, १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. शाहू, फुले, आंबेडकर, भाऊसाहेब देशमुख फाउंडेशन, अमरावती यांच्या वतीने सर्व समाजबांधवांना, नागरिकांना व भाऊसाहेब देशमुख प्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.