Amravati Police did not even heed the letter of MP Balwant Wankhede : कर्मीक्षा निधी बँकेच्या फसवणुकीप्रकरणी पोलिस निष्क्रिय
Amravati : कर्मीक्षा निधी बँकेने शहरातील ३०० हून अधिक छोट्या व्यावसायिकांची मोठी फसवणूक केली. असे असतानाही पोलिस यंत्रणा अद्याप निष्क्रिय आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खासदार बळवंतराव वानखडे यांनी या प्रकरणात तत्काळ कारवाईसाठी पोलिस आयुक्तांना पत्र दिले असले, तरी अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाही. पोलिस यंत्रणा लोकप्रतिनिधींनाही जुमत नसल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी रखडली आहे. फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी पोलिस आयुक्तांच्या तक्रार निवारण सप्ताहात दाद मागितली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गाडगेनगर पोलिसांना आरोपपत्र तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही.
व्यावसायिकांना मोठ्या कर्जाचे आमिष..
कर्मीक्षा निधी बँकेचे संभाजीनगर येथील संचालक संतोष सरदार आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी अमरावतीत शाखा सुरू केली होती. त्यांनी छोट्या व्यावसायिकांना आकर्षक गुंतवणूक योजना सांगून मोठ्या कर्जाचे आमिष दाखवले. सहा महिन्यांत जमा होणाऱ्या रकमेच्या आधारे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
गुंतवणूक घेतली, पण पैसे परत केले नाहीत..
भाजीपाला, गोळ्या-बिस्किटे आणि फळे विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक घेतल्यानंतर सहा महिने उलटताच बँकेने पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. गुंतवणूकदारांनी तगादा लावल्यानंतर सरदार आणि त्यांचे सहकारी बँकेला कुलूप लावून अमरावतीतून फरार झाले.
तक्रार दाखल, पण कारवाई शून्य..
या फसवणुकीविरोधात जगदीश कन्हैयालाल श्रीवास आणि इतर व्यावसायिकांनी ५ जुलै २०२३ रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या प्रकरणात विलंब का होत आहे? फसवणूक करणाऱ्या आरोपींना अद्याप अटक का झाली नाही, अशा प्रश्नांनी आता जोर धरला आहे.