Where did the ‘Chai Pe Charcha’ in ‘Dabhadi’ go? NCP Sharad Pawar reminded PM Narendra Modi : उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणार होते पंतप्रधान
Gurukunj Mozari – Amravati : ‘बुरे दिन जायेंगे, अच्छे दिन आयेंगे’, असे आश्वासन ११ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आदिवासीबहुल आणि आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी या छोट्याशा गावात मोदींनी ‘चाय पे चर्चा’ केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि त्यावर ५० टक्के नफा, या सूत्रानुसार शेतमालाला भाव देऊ, असेही आश्वासन मोदींनी दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गेल्या पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला आहे. या पाठींब्याचे अधिकृत पत्र अनिल देशमुख यांनी आज (ता. १३ जून) बच्चू कडू यांना दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली.
Prahar’s Agitation : बच्चू कडू ऐकतील, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास !
यावेळी अनिल देशमुख म्हणाले, राज्यात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा कापसाला १४ हजार रुपये तर सोयाबीनला आठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. आता महायुती सरकारमध्ये कापसाला फक्त सात हजार तर सोयाबीनला चार हजार रुपये भाव मिळतो आहे. हा अन्याय आहे आणि या अन्यायाची जाणीव जोपर्यंत विरोध दर्शवून आपण सत्ताधाऱ्यांना करवून देत नाही, तोपर्यंत त्यांची हुकूमशाही अशाच पद्धतीने सुरू राहिल.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव यांसह इतर विविध विषयांवर आम्हीसुद्धा सातत्याने आंदोलने करत आहोत. बच्चू कडू यांनी सरकारच्या विरोधाच जे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे, त्याला आमच्या पक्षाचा पाठींबा आहे. आमचे नेते शरद पवार या आंदोलनच्या सोबत आहेत, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.