They should have woken up while they were still in power : बच्चू कडूंवर आमदार रवी राणांचा प्रहार, मशाल पेटवून आंदोलन
Amravati माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरात सुरू असलेल्या मशाल आंदोलनावर बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी टीकेची झोड उठवली. अमरावतीत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन स्वीकारल्यानंतर रवी राणा यांनी “सत्तेची पावर होती तेव्हाच जाग आली असती, तर हे प्रश्न आज अस्तित्वातच राहिले नसते,” असा टोला बच्चू कडूंना लगावला.
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंनी नुकतेच मंत्री व आमदारांच्या निवासस्थानाबाहेर मशाल पेटवून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रवी राणा यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
Bacchu Kadu: शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे तीव्र आंदोलन; बच्चू कडू आक्रमक
“बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जात होते. त्याचप्रमाणे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही ते जवळचे आहेत. सत्ता, आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळ पोहोचलेली माणसं शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सहज मार्गी लावू शकत होती. मात्र त्यांना या प्रश्नांचं गांभीर्य आता का जाणवतंय, याचं आश्चर्य वाटतं,” असे राणा म्हणाले.
तथापि, त्यांनी यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपली बांधिलकी अधोरेखित केली. “शेतकरी हा माझ्यासाठी राजकारणाचा नव्हे, तर जीवनाचा मुद्दा आहे. त्यामुळे या लढ्यात बच्चू कडूंसोबत लढा देण्याची माझी तयारी आहे. प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवायला हवं,” असेही राणा यांनी स्पष्ट केले.
राजकारणात टीका-प्रतिटीकांच्या पार्श्वभूमीवर रवी राणांचा हा संतुलित परंतु सूचक प्रहार आता राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. बच्चू कडू यांची यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.