bacchu-kadu-elgar-padyatra-in-melghat-for-tribal-rights : मेळघाटात आजपासून बच्चूकडूंची ‘एल्गार’ पदयात्रा, आदिवासींच्या हक्कासाठी लढा
Amravati मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी, कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न शासनाच्या दारी मांडण्यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज, १ मार्चपासून ‘एल्गार’ पदयात्रेला सुरुवात केली आहे. सुमारे २५० किलोमीटर अंतराची ही पदयात्रा असून, मेळघाटातील जनसामान्यांचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या पदयात्रेची सांगता ९ मार्च रोजी चिखलदरा येथे ‘महाअंतिम’ मोर्चाने होणार आहे.
ही पदयात्रा केवळ राजकीय आंदोलन नसून, मेळघाटातील गावागावांत जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार असून, नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या तात्काळ नोंदविल्या जाणार आहेत. “आम्ही केवळ मागण्या मांडणार नाही, तर शासनाला जाब विचारणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
Hindu Sammelan : व्यक्तीधर्माची पूजा करणाराच खरा राष्ट्रप्रेमी
३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे, १५ मार्चपर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, नापिकी व हमीभावाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामांचे वेतन एका आठवड्यात खात्यात जमा व्हावे, अशीही मागणी आहे.
वन्यप्राणी संघर्षात मानवी मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये, तर कायमस्वरूपी अपंगत्वासाठी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे धोरण जाहीर करावे, अशी ठोस मागणी पदयात्रेतून मांडण्यात आली आहे.
वीजविहीन गावांना तत्काळ वीजपुरवठा करणे, स्मार्ट मीटर हटवून पारंपरिक मीटर बसविणे, तसेच जलजीवन मिशनच्या कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दुर्गम गावांना जोडण्यासाठी रस्ते व सुरक्षित वाहतुकीसाठी लहान बसेस (ट्रॅव्हलर) सुरू करण्यावरही भर देण्यात आला आहे.
“ही पदयात्रा कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून, मेळघाटातील जनतेच्या अस्तित्वासाठी आहे. शासनाने आश्वासनांच्या पुढे जाऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा जनतेचा रोष तीव्र होईल,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.








