Opposition leaders meet Governor C.P. Radhakrishnan : विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट
Mumbai : विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सभापती आणि अध्यक्ष विरोधी पक्षाच्या सदस्यांना योग्य संधी देत नाही. यासंदर्भात काल (१९ मार्च) भास्कर जाधव, जयंत पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी रोष व्यक्त केला होता. सभागृहात मंत्री नाहीत, सचिवही राहात नाहीत, असे म्हणत सदस्यांनी संताप व्यक्त केला होता. ‘सत्तावेध’ने हे वृत्त दिले होते. आज (२० मार्च) विरोक्षी पक्षाच्या सर्व नेत्यांनी यासंदर्भात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन पत्र दिले.
पत्रामध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणतात, ‘संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भुमिका सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविणे आहे. तथापि, महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा सभागृहामध्ये मा. सभापती व मा. अध्यक्ष यांचेकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे.
दोन्ही सभागृहांच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य सभागृहाचे कामकाज चालविले जात आहेत. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना सभागृहात मा. सभापती व मा. अध्यक्ष यांच्याकडून बायस वागणूक मिळत असून सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात असल्याने त्यांच्या हक्कांचे संरक्षण होण्यासाठी ही बाब आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहे.
विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून, नियमबाह्य रीतीने महत्त्वपूर्ण चर्चा करताना विरोधी पक्षाची अडवणूक केली जात आहे. विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असताना त्यांच्या सूचनांना सरकार कडून उत्तर दिले जात नाही. पुरवणी मागणीच्या चर्चेच्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री व राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
Collector of Yavatmal on March Ending: जिल्ह्याला मिळालेला एकही रुपया शिल्लक ठेवू नका!
सभागृहाच्या अदृश्य गॅलरीमध्ये संबंधित खात्याचे सचिव सुध्दा उपस्थित नसतात. संबंधित खात्याचे राज्यमंत्री उपस्थित असताना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्याना चर्चेस उत्तर देण्याचा अधिकार दिला जात आहे. अश्या प्रकारे विधानपरिषदेच्या सभापतींनी सभागृह चालविताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला असून, त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे.’
राज्यपालांच्या भेटीप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अनिल परब, भास्कर जाधव, भाई जगताप, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत, सचिन अहिर, आनंद बाळा नर, प्रवीण स्वामी, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, अरुण शेठ, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील व वरुण सरदेसाई उपस्थित होते.