Breaking

Buttibori overbridge : उड्डाणपूल बंदच; वाहतूक व्यवस्थेला तडे !

 

Butibori flyover closed since 14 days : १४ दिवसांपासून होताहेत नागरिकांचे हाल

जड वाहन गेल्याने तडे गेलेला बुटीबोरी उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे तो बंद ठेवण्याच्या सूचना व्हीएनआयटीने एनएचआयला केल्या आहेत. तडे गेलेला भाग आता तोडावा लागणार असून नव्याने त्यांची निर्मिती करावी लागणार आहे. चूक कोणाची यावरही आता मंथन सुरू झाले आहे.

नागपूर चंद्रपूर-वर्धा मार्गाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलाला २४ डिसेंबर रोजी तडे गेले होते. जड वाहन या पुलावरून गेल्याने सहा ते सात ठिकाणचा पुलाखालील सिमेंटचा भाग तुटला. एनएचएआयकडून हे सांगितले जात होते. मात्र जड वाहनांची क्षमता असल्याचे एनएचएआयकडून सांगितले जात आहे. हा पूल का खचला याबाबत तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहे.

व्हीएनआयटीच्या तज्ज्ञांकडून या पुलाची तपासणी करण्यात येत आहे. याचा अहवाल मात्र अद्यापही प्राप्त व्हायला आहे. एनएचएआयची चमूही यावर बारीक लक्ष ठेऊन आहे. पुढील दोन दिवसांत अंतरिम अहवाल प्राप्त होणार आहे. संपूर्ण अहवाल प्राप्त होण्यासाठी आणखी १० दिवसांचा अवधी लागेल. त्यामुळे तुर्तास तरी हा पूल सुरू होणार नाही, असे संकेतच एनएचएआयकडून देण्यात आले.

७० कोटी रुपये खर्च
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उड्डाण पूल १७ जून २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुला केला होता. पावणे दोन किलोमीटरच्या या पुलासाठी ७० कोटी रुपये खर्च झाला होता. तडे जाण्यापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. साडेतीन वर्षांत दुरुस्तीची गरज का पडली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाहतूक विस्कळीत
वर्धा मार्गावर आणि बुटीबोरी एमआयडीसीकडे जाणाऱ्या चौकातील राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नागपूरहून हा राष्ट्रीय महामार्ग पुढे हैदराबादकडे जातो. तसेच विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना याच मार्गाने जावे लागते. त्यामुळे हा अतिशय वर्दळीचा मार्ग आहे.