Congress Leader Vijay Wadettiwar Should Tell Us, Sub-Committee Will Decide : सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करू नये
Nagpur : ओबीसींकरिता आमचे सरकार कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. ओबीसींना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. डॉ. बबनराव तायवाडे यांनी जे समजून घेतले, ते विजय वडेट्टीवार यांनीही समजून घ्यावे. कुठल्या शब्दाने, कुठल्या वाक्याने ओबीसींवर अन्याय झाल्याचे त्यांना वाटत आहे, ते त्यांनी उपसमितीला सांगावे. सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार आहे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
यासंदर्भात नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्या (१० सप्टेंबर) माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. या बैठकीला छगन भुजबळ, पंकजा मुंडे, दत्ता भरणे, गुलाबराव पाटील आदी सहा – सात मंत्री आहेत. उद्या ११ वाजता बैठक सुरू होणार आहे. विजय वडेट्टीवार यांना काही शंका वाटत असेल, तर त्यांनी ती आमच्या उपसमितीला कळवावी. सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. त्यांच्या म्हणण्यावर उपसमिती नक्की विचार करेल आणि योग्य निर्णय देईल.
२०१४ ते २०१९ आणि त्यानंतरही ओबीसींचे कुठलेही नुकसान होईल, असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला नाही. काँग्रेसच्या काळात जे कधीही झाले नाही, ते ओबीसी मंत्रालय आमच्या सरकारने स्थापन केले. राज्यात ओबीसी समाजाला मंत्री दिला पाहिजे, ही भूमिका सर्वप्रथम आम्हीच घेतली असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. अतुल सावे यांनी सोडवलेल्या उपोषणासंदर्भात बैठक बोलावली आहे. ज्या काही मागण्या असतील आणि जेथे कुठे संशय निर्माण झाला असेल, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ओबीसी उपसमितीची बैठक आहे, असेही ते म्हणाले.








