Avoid smart phone in school premises : मुख्यंत्र्यांना निवेदन; शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची भीती
Akola विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर होणाऱ्या परिणामाचा विचार करता, महाराष्ट्रातील शाळांमध्ये स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना देण्यात आले आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची भीती या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
या पत्रात ओईसीडीच्या OECD आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम २०२२ चा दाखला देण्यात आला आहे. शाळांतील स्मार्टफोन विद्यार्थ्यांचे अभ्यासातील लक्ष विचलित करतात. फोनवरील सतत सूचना, सोशल मीडियाचा आकर्षण, तसेच व्हिडिओ गेममुळे विद्यार्थी अभ्यासापासून दूर जातात. एकाग्रता कमी होते, झोपेच्या समस्याही निर्माण होतात, असे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी म्हटले आहे.
Vidarbha Farmers : कर्जमुक्तीसाठी बाळापूरमध्ये शेतकरी पुत्रांचा एल्गार
विद्यार्थ्यांच्या गणितातील मूलभूत संकल्पनाही कॅल्क्युलेटरच्या वापरामुळे दुर्लक्षित होतात, अशी निरीक्षणे त्यांनी मांडली आहेत. युनेस्कोने २०२३ मध्ये शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्याचे आवाहन केले असून, फ्रान्स, इटली, ग्रीस, हंगेरी, अमेरिका, चीनसह अनेक देशांनी अशा प्रकारच्या बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे.
प्रा. खडक्कार पुढे म्हणतात की, शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जावे. मात्र, विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही शाळेच्या वेळेत स्मार्टफोन वापरण्यास बंदी असावी.
बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनीही त्यांच्या मुलांना विशिष्ट वयापर्यंत स्मार्टफोन देणे टाळले, याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की आपल्याही समाजाने हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून योग्य निर्णय घ्यावा.
“विद्यार्थ्यांचे मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी आवश्यक आहे,” असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.