Maharashtra is leading state in terms of development : निती आयोगाने दिल्या नव्या कल्पना; मुख्यमंत्र्यांपुढे Presentation
Mumbai देशभरात विकासकामं सुरू आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. पण या संपूर्ण परिस्थितीत महाराष्ट्राचा विकासाचा वेग इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्याच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी आपण सातत्याने काम करत आहोत. तसेच राज्यात अनेक मोठे प्रकल्प आणि विकास कामे सुरू आहेत. त्यांना गती दिली जात आहे. नवीन गुंतवणूक येत आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ‘विकसीत भारत २०४७’ यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करावा लागणार आहे. तसेच त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सुब्रह्मण्यम यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निती आयोगाच्या संकल्पना मांडल्या. तसेच राज्याने कोणत्या क्षेत्रात काम करण्याची अपेक्षा आहे याविषयी माहिती दिली.
मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. २ ट्रिलियन क्षमतेचे मुंबई हे देशातील एकमेव राज्य आहे. महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव तंत्रज्ञान आणि क्वांटम संगणक क्षेत्रात काम करावे. या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात संधी आणि क्षमता दोन्ही आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेले काम देशात सर्वोत्कृष्ट आहे. राज्याचे हे काम देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरावे. महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा तयार आहे. त्यास आणखी वेग देण्यात यावा. सुरू असलेल्या विकासकामांचे वॉर रुमच्या माध्यमातून नियमित आढावा घेतला जावा’, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृह्नमुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.