The bullies will be punished in Beed case : बीड प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
बीडच्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण क्षमतेने कारवाई करत आहेत. या प्रकरणात कुणालाही वाचविण्याचा प्रयत्न झालेला नाही. जर कुणी तसा प्रकार केला तरी कुणालाही वाचवू देणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. जे दादागिरी करतात किंवा दहशत निर्माण करतात, जनतेत जरब बसविण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरकार सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे
रविवारी (दि. ५ जानेवारी) ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. बीडमध्ये सरपंचांची झालेली हत्या हा गंभीर प्रकारच आहे. मात्र या घटनेवरून होत असलेले राजकारण दुर्दैवी आहे. या प्रकरणातून राजकारणाऐवजी समाजात सुधार व्हावी यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कुठल्याही मुद्द्यावरून सार्वजनिक ठिकाणी मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. पोलिसांची योग्य कारवाई सुरू आहे. अंजली दमानिया यांची जी काही तक्रार असेल ती त्यांनी पोलिसांकडे करावी. त्यावर योग्य पावले उचलली जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.
त्यांना सोडणार नाही
आरोपी कुठेही गेले असतील व कुणीही मदत केली असेल तर कारवाई होत आहे. या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सोडणार नाही व काही जण चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी होऊ द्यावी. चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही हा आमचा शब्द आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.