200 lakes in Bhandara will be transformed : ‘गाळमुक्त धरण समृद्ध शिवार’ योजनेला प्रारंभ
Bhandara जिल्ह्यातील तलावांमध्ये साचलेल्या गाळामुळे कमी झालेली पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ शुक्रवारी झाला. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील २०० तलावांचा कायापालट होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात योजनेच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार परिणय फुके, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, उपवनसंरक्षक राहुल गवई, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, माजी आमदार प्रदीप पडोळे, तसेच टाटा मोटर्स व नाम फाउंडेशनचे अधिकारी आणि अनेक सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य सरकारने नाम फाउंडेशन व टाटा मोटर्सच्या सहकार्याने जिल्ह्यात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंधारण अधिकाऱ्यांनी योजनेची अंमलबजावणी, प्रक्रिया आणि उद्दिष्टे याबाबत सविस्तर माहिती दिली. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अवनी ॲपचा वापर होणार असून, स्थानिक अडचणी सोडवण्यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २०० तलावांमधून सुमारे २० लाख क्युबिक मीटर गाळ काढला जाणार आहे. नंतरच्या टप्प्यात आणखी १ ते २ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गाळ शेतकऱ्यांना निःशुल्क देण्यात येणार असून मुरूम व माती फक्त शासकीय कामासाठी वापरण्यात येणार आहे.
Education department : नियम झुगारून शिक्षणाधिकाऱ्याची नियुक्ती; शिक्षक संघटनेचा संताप
भंडारा जिल्ह्याचे ५० टक्के क्षेत्र इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येते. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी करताना पर्यावरणीय अडचणी न येण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. सुरुवातीला जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ही योजना केवळ आजसाठी नव्हे, तर पुढील शंभर वर्षांची जलसुरक्षा व कृषी समृद्धी सुनिश्चित करणारी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले. त्यांनी प्रशासन, सरपंच आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे समन्वय साधत या योजनेला यशस्वी बनवण्याचे आवाहन केले.