Allegations of diverting funds to other departments : शेकडो कोटींचा निधी इतर विभागांकडे वळवल्याचा आरोप
Gondia राज्यातील महायुती सरकारने सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या शेकडो कोटींच्या निधीचा वापर इतर विभागांमध्ये वळवला आहे. हा निधी वंचित, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी समाजाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी होता. मात्र हा निधी वळवल्यामुळे सरकारने सामाजिक न्याय व्यवस्थेवरच घाला घातल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
याच निषेधार्थ गोंदिया शहरात काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाने आज शहराचे लक्ष वेधून घेतले. सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी आणि आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवल्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, वसतिगृहे, व्यवसाय अनुदान, आरोग्य सुविधा यावर परिणाम होणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसने या निर्णयाचा तीव्र निषेध करत, सरकारच्या धोरणांवर आक्रमक टीका केली.
Farmer’s agitation : वारे विदर्भाच्या पोरा.. सातबारा कोरा.. तुझा खोटा रे नारा..!
या भव्य मोर्चात खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी आमदार दिलीप बन्सोड आणि काँग्रेसचे महासचिव अमर वऱ्हाडे आदी नेत्यांनी सरकारला जाहीर इशारा दिला. डॉ. पडोळे म्हणाले, “महायुती सरकार हे उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार आहे. बहुजनांचे हक्क बळकावून त्याचा वापर सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी करत आहे. हा निधी वळवणं म्हणजे घटनाविरोधी पाऊल आहे.”
दिलीप बन्सोड यांनी ठामपणे सांगितले, “हा निधी जर परत मिळाला नाही, तर काँग्रेस जनतेच्या ताकदीवर राज्यभरात जनआंदोलन उभं करेल.” तर अमर वऱ्हाडे यांनी आवाहन केलं की, “हा लढा निधी मिळवण्यापुरता मर्यादित नाही, तर बहुजन समाजाच्या स्वाभिमानाचा आहे. ही फसवणूक आम्ही सहन करणार नाही.”
Reservation sub-category : मातंग समाजाचा जनआक्रोश, मुंबईत धडकणार!
मोर्चादरम्यान ‘आमचा हक्क आमच्याचसाठी’, ‘बहुजनांचा निधी वळवू नका’, ‘सामाजिक न्यायाशी गद्दारी नको’ अशा घोषणा देत शेकडो कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक झाले. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मोर्चाने वाहतुकीवर परिणाम करत शासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.
काँग्रेसने सरकारला स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली आहे की, जर काही दिवसांत हा निधी मूळ विभागांकडे परत वळवण्यात आला नाही, तर संपूर्ण राज्यभर जनआंदोलन उभारून रस्त्यावर उतरू. या मुद्द्यावरून आता सामाजिक न्यायाचा विषय पुन्हा केंद्रस्थानी आला आहे.
ED notice to Sonia and Rahul Gandhi : आंदोलनावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने!
गोंदियातील हे आंदोलन फक्त सुरुवात असून, बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेस सडेतोड भूमिका घेत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. महायुती सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ निधी परत दिला नाही, तर जनतेचा उद्रेक रोखणे कठीण होईल.