Breaking

Crime in Akola : पत्नी व सावत्र मुलीचा गळा आवळून खून केला, नंतर मृतदेहांना घास भरवला

Wife and stepdaughter strangled to death : घरगुती वादातून उचलले टोकाचे पाऊल, दोन महिन्यापूर्वीच दुसरे लग्न

Akola शहरातील तारफायल परिसरात घडलेली दुहेरी हत्या जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे. घरगुती वादातून पत्नी व सावत्र मुलीचा गळा आवळून खून करून, त्यानंतर मृतदेहांना जेवणाचा घास भरवण्याचा संतापजनक प्रकार अकोल्यातील सिद्धार्थनगर भागात उघडकीस आला आहे.

ही घटना रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सूरज उर्फ गोट्या गणवीर (वय 35) याने पत्नी अश्विनी गणवीर (वय 25) आणि तिच्या तीन वर्षांची मुली आरोही गणवीर यांचा खून केला. सततच्या वादाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे.

Chief Minister’s Help Desk : गरजू रुग्णांना आता शहरातच मिळणार मदतीची माहिती

सूरजने दोन महिन्यांपूर्वी अश्विनीसोबत दुसरा विवाह केला होता. अश्विनी हिचंही हे दुसरं लग्न होतं. तिला पूर्वीच्या लग्नातून आरोही नावाची तीन वर्षांची मुलगी होती. लग्नानंतर काही काळ सूरज व अश्विनी यांचा संसार सुरळीत चालला. मात्र, सूरजच्या पहिल्या पत्नीच्या मुली सतत घरी येऊ लागल्याने नवी पत्नी अश्विनी नाराज होती. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.

शनिवारी दुपारी सूरज घरी जेवण करत असताना अश्विनीने पुन्हा वाद सुरू केला. वाद वाढला आणि चिडून सूरजने आधी अश्विनीचा, त्यानंतर आरोहीचा गळा आवळून खून केला. इतक्यावरच न थांबता, त्याने मृतदेहांना जेवणाचा घास भरवण्याचे क्रूर कृत्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूरजने अश्विनीचा खून केल्यानंतर, आपल्या पहिल्या पत्नीच्या घराकडे गेला आणि तिथेही तिच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वेळी मुलीचे आजी-आजोबा उपस्थित होते. त्यांनी सूरजला अडवले आणि मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सूरजला ताब्यात घेतले आहे. सध्या तो रामदासपेठ पोलीस ठाण्यात असून, अधिक तपास सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अश्विनीवर जवळपास एक लाख रुपयांचे कर्ज होते, जे सूरजने अलीकडेच फेडले होते. त्यामुळे आधीच आर्थिक ताणात असलेला सूरज सततच्या वादाला वैतागला होता. अखेर त्याचा मानसिक समतोल ढासळल्यानेच त्याने हे भयंकर पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

Castbase census: जातीनिहाय जनगणना; भाजपपाठोपाठ काँग्रेसचाही जल्लोष

या दुहेरी हत्येची माहिती पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. आरोपी सूरजला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी त्याच्यावर संतप्त नातेवाईकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे.