The issue of expansion of Akola airport will be resolved soon : अजितदादांनी दिले संकेत; म्हणाले, विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लावू
Amravati अमरावती ते मुंबई विमानसेवेचा शुभारंभ बुधवारी अमरावती विमानतळावर उत्साहात झाला. या प्रसंगी आयोजित उद्घाटन समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अकोल्याच्या विमानतळाच्या विकासाबाबत सकारात्मक आणि आशावादी भूमिका मांडली. अकोला विमानतळासाठी लागणाऱ्या अडचणी लवकरच दूर करून तिथूनही विमानसेवा सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीही त्यांच्या भाषणामध्ये अकोल्याच्या विमानतळाच लवकरच विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे अकोल्याच्या विमानतळ संदर्भात आशा आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
पवार म्हणाले, “अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासाठी येताना अकोला विमानतळासंदर्भात मुख्यमंत्री व केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. सध्या काही जमीन विषयक अडथळे आहेत, मात्र त्या अडचणी लवकरच मार्गी लावल्या जातील. अकोल्यातूनही लवकरच विमानसेवा सुरू होईल, असा आमचा मानस आहे.”
CM Devendra Fadnavis: अत्याधुनिक साधनांनी पोलिस दल सक्षम होणार
या घोषणेमुळे अकोल्यातील विमानतळाच्या भवितव्याबाबत आशेचे किरण दिसू लागले आहेत. अकोला हे विदर्भातील महत्त्वाचे केंद्र असून, हिंगोली, वाशिम, बुलढाणा अशा जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी अकोला विमानतळ उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे याठिकाणी विमानसेवा सुरू होणे काळाची गरज असल्याचे अनेकांचे मत आहे.
अमरावती येथील विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात अकोला जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती खटकणारी ठरली. अमरावती व वाशिम जिल्ह्यांतील खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आणि माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित होते. मात्र भाजपचे अकोल्यातील तिन्ही आमदार या कार्यक्रमाला गैरहजर होते, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
या अनुपस्थितीमागे अकोला विमानतळाच्या निर्णय प्रक्रियेतील नाराजी आहे का, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अधिकृत स्पष्टीकरण नसले तरी, या पार्श्वभूमीवर आगामी काळात अकोला विमानतळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.