90 murder incidents in Home Minister’s city in 2024 : गृहमंत्र्याच्या शहरात वर्षभरात 90 हत्याकांडाच्या घटना
Nagpur-गृहमंत्र्यांचे शहर असूनही शहरात गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 90 हत्याकांडांनी उपराजधानी हादरली आहे. गेल्या 6 दिवसांत तर तब्बल 7 हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. एकामागून एक होत असलेल्या हत्याकांडांनी नागपूरकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे ‘नागपूर की मिर्झापूर’ असा सवाल उपस्थित होत आहे. या वाढत्या हत्याकांडांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपराजधानीत गेल्या काही महिन्यांपासून हत्याकांडाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी ते डिसेंबर महिन्यांत 90 हत्याकांडाच्या घटना समोर आल्या आहेत. मिर्झापूर या वेबसिरिजमध्ये दिवसाढवळ्या गुंड भरचौकात खून करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. तशीच परिस्थिती आता नागपुरातही निर्माण झाली आहे. पोलिसांचा वचक नसल्यामुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. वैयक्तिक कारणांसह किरकोळ कारणांमधून या हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
दिवसाढवळ्या चाकूने भोसकणे, पैशांची मागणी करत दगडाने ठेचून खून, चाकूहल्ला असे प्राणघातक हल्ले शहरात वाढले आहेत. गेल्या सहा दिवसांत सात हत्येच्या घटनांनी नागपूर शहर हादरले आहे. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध आहेत. त्यात अंमली पदार्थ तस्करांचाही समावेश आहे. खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना सर्वाधिक आहे.
Beed Incident Impact : 400 सरपंच धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर !
शहरात घडलेल्या हत्याकांडासाठी अनेक प्रकारची कारणे देण्यात आली आहेत. त्यात वैमनस्य, टोळीयुद्ध, युवक-युवतीमधील प्रेमसंबंध, विवाहित महिला व पुरुषांचे असलेले अनैतिक संबंध, धार्मिक तेढ, कौटुंबिक वाद, संपत्तीच्या वादासह अन्य कारणांचा समावेश आहे. परंतु, शहरात सर्वाधिक हत्याकांड कौटुंबिक कारण आणि अनैतिक संबंधातून घडलेले आहेत.
गेल्या वर्षी 79 हत्याकांड नागपुरात घडले होते. मात्र, यावर्षी आकडा वाढून 90 हत्याकांडांच्या घटनांपर्यंत पोहचला आहे. जर पोलिसांनी अजुनही गांभीर्य न दाखविल्यास नागपूरचे मिर्झापूर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, उपराजधानीत महिलांवर लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार आणि विनयभंगाच्या घटनांसह महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यावरुन गृहमंत्र्यांच्या शहरातील महिलाच सुरक्षित नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केल्यास पोलीस गांभीर्य दाखवत नाहीत. अशा तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे