
Shivsena district chief Gopal Datkar and 11 others acquitted : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय तोडफोड प्रकरणात निर्णय
Akola दहिहंडा व परिसरात तीव्र पाणीटंचाई असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ जानेवारी २०१६ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अकोला येथील कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा तत्कालीन जिल्हा परिषद सर्कल सदस्य गोपाल दातकर यांच्यासह ११ आंदोलकांना अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
दहिहांडा परिसरातील नागरिकांना दीर्घकाळापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी गोपाल दातकर, पंचायत समिती सदस्य गजानन वानखडे यांच्यासह अनेक नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र, अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आणि पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याच्या आरोपातून आंदोलक आक्रमक झाले. या दरम्यान कार्यालयाची तोडफोड करण्यात आली तसेच कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले.
Vidarbha State demand : पर्यटन व औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष, विदर्भाच्या अस्तित्वासाठी लढा
या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गोपाल दातकर, गजानन वानखडे, सर्कलप्रमुख अविनाश राऊत, अकोला तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक गजानन चराटे, अनिल मोहरकार, गोकुल कंडाळे, सुधाकर शिरसाट, निलेश डहाके, गुलाबराव शिरसाट, पांडुरंग पाटकर व सैयद शारीक यांना जिल्हा परिषद परिसरातून अटक करण्यात आली होती.
अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहिहंडा परिसरातील हजारो ग्रामस्थांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धडक देत आंदोलन केले. त्यानंतर सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले होते.
या प्रकरणाची सुनावणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षाकडून एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, उलट तपासणीदरम्यान आरोपींनी तोडफोड, शिवीगाळ केली किंवा शासकीय कामात अडथळा निर्माण केला, हे ठोसपणे सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) श्री. तेजवंदरसिंग संधु यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. गणेश परियाल यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.








