Western Vidarbha is behind Eastern Vidarbha in Industrial & Service sector : उद्योग अन् सेवा क्षेत्रात आघाडी, समतोल विकासासाठी हवा विशेष आराखडा
Akola विदर्भातील विकासाचा असमतोल वाढत आहे. पश्चिम विदर्भाच्या प्रगतीसाठी विशेष विकासात्मक आराखड्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) शेतीचा वाटा १२ टक्के, उद्योगाचा ३२ टक्के आणि सेवांचा ५६ टक्के आहे. मात्र, विदर्भाच्या संदर्भात विचार केला तर, पूर्व विदर्भ (नागपूर विभाग) हा उद्योग आणि सेवा क्षेत्रात पश्चिम विदर्भ (अमरावती विभाग) यापेक्षा दुप्पट पुढे आहे.
२०२२-२३ मध्ये महाराष्ट्रातील सेवा क्षेत्रात विदर्भाचा वाटा १४.५ टक्के होता. नागपूर विभाग – ९.३ टक्के आणि अमरावती विभाग – ५.२ टक्के असे प्रमाण होते. त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रात विदर्भाचा वाटा १४.५ टक्के आहे. यामध्ये नागपूर विभाग – ९.४ टक्के आणि अमरावती विभाग – ५.१ टक्के असे प्रमाण आहे.
याचाच अर्थ नागपूर विभागाचा उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वाटा अमरावती विभागाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. शेती क्षेत्रात दोन्ही विभागांचा वाटा जवळपास समान असूनही, अमरावती विभाग औद्योगिक आणि सेवाक्षेत्रात मागे पडल्यामुळे समतोल विकासाचा अभाव जाणवत आहे.
अमरावती विभागाचा विकास अपेक्षेपेक्षा मंद गतीने होत असल्याने, भविष्यात रोजगाराच्या संधी कमी होतील आणि नव्या आर्थिक व सामाजिक समस्या उद्भवू शकतात. विदर्भाच्या समतोल प्रगतीसाठी पश्चिम विदर्भातील औद्योगिकरण आणि सेवा क्षेत्राच्या विकासाला गती देणे आवश्यक आहे.
विदर्भाच्या दोन्ही विभागांतील असमतोल विकास रोखण्यासाठी पश्चिम विदर्भासाठी विशेष विकासात्मक आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. औद्योगिक आणि सेवाक्षेत्रात गुंतवणूक वाढवून अमरावती विभागाचा विकास जलदगतीने करावा, अशी मागणी प्रा. डॉ. संजय खडक्कार (माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ) यांनी केली आहे.