Eknath Shinde : ५० खोके नव्हे, तर ३ हजार खोके दिले!

Eknath Shinde’s scathing criticism on Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका

Mumbai : मागील अडीच वर्षात विकास कामांसाठी आमदारांना तीन हजार कोटींचा निधी दिला. मात्र सरकारवर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना मतदारांनी विधानसभा निवडणुकीत खोक्यात बंद केले, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पन्नास खोके नव्हे तर तीन हजार खोके विकास कामांसाठी दिले, असे शिंदे म्हणाले.

उबाठाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजी नगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काल (१८ मार्च) शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या पक्ष प्रवेशाने कोकणात आणि छत्रपती संभाजी नगरात उबाठा गटाला मोठे खिंडार पडले.

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेत स्वगृही परतले. कोकणात शिवसेना वाढत आहे. कोकणात एक जागा वगळता सर्वच जागांवर महायुतीचे आमदार जिंकले आहेत. कोकणी जनतेने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर नेहमीच प्रेम केले. मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम कोकणात काम करत आहेत.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मागील पंचवीस वर्ष कोकणात काम केले. आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. कोकणातील भूमीपूत्रांना तिथेच रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असे ते म्हणाले. शिवसेनेचे दोन कदम एकत्र आल्याने आता दापोलीत फक्त शिवसेनेचा दम राहणार असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

काम करणारा कार्यकर्ता उबाठामध्ये राहणार नाही, तो शिवसेनेमध्येच येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी मुंबईतील भांडुपचे माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक आणि गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखप्रमुख, महिला सेना आणि शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Ravikant Tupkar : आंदोलन करणाऱ्यांना झोपेतच अटक!

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर, गंगापूर मतदारसंघात आमदार रमेश बोरनारे यांच्या पुढाकाराने माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबीर खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, माजी पंचायच समिती सभापती-राजू मगर, डॉ.राजू डोंगरे, राम हरी जाधवे, बाबासाहेब जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.