Opposition Leader Ambadas Danve met the family of farmer : नागरे कुटुंबियांनी मांडली कैफियत; विरोधीपक्षनेत्यांनी केले सांत्वन
Buldhana युवा शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात निवेदन दिले. त्यात त्यांनी आठ किलोमीटरवरून शिवणी आरमाळ आणि इतर गावांना पाणीपुरवठा करण्याचा मुद्दा मांडला. मात्र, हे विधान चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचा आरोप नागरे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केला आहे.
विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आज, गुरुवार, दि. २७ मार्चला नागरे कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी कुटुंबियांनी आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडली. गावकऱ्यांनी नकाशासह संपूर्ण माहिती दानवे यांना दिली. ‘नदी जोड प्रकल्प ही केवळ थाप आहे. आमच्या नातवंडांना तरी हे पाणी मिळेल की नाही याची खात्री नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दानवे यांनी शिवनी आरमाळ येथे भेट दिली. १४ गावांसाठी सिंचनाच्या पाण्याचा लढा उभारून बलिदान देणारे शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची दानवे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या पुढाकारातून जिल्हा शिवसेनेच्या वतीने पाच लक्ष रुपयांचा बचत ठेव स्वरूपातील (एफडी) निधी नागरे कुटुंबीयांकडे दानवे यांच्या हस्ते सोपवण्यात आला.
यावेळी ना. दानवे यांनी नागरे कुटुंबीयांशी संवाद साधत १४ गावांच्या पाणी समस्येचा आढावा घेतला. ते म्हणाले, “मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी मिळू नये म्हणून एक लॉबी कार्यरत आहे. स्व. कैलास नागरे यांची आत्महत्या नव्हे तर बलिदान आहे. त्यांनी केवळ स्वतःपुरता विचार केला नाही, तर १४ गावांचा पाणी प्रश्न सुटावा हीच त्यांची इच्छा होती. शिवसेना त्यांच्या या लढ्यासोबत आहे. १० एप्रिलच्या आत मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची ग्वाही मी देतो.”
Maharashtra State Primary Teachers Committee : आम्हाला गुरुजी हवेत, आमचे शिक्षण थांबवू नका!
यावेळी स्व. कैलास नागरे यांच्या बहीण स्नेहलताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “आमचा भाऊ हा आधुनिक शेतकरी होता. १५ दिवस झाले, अनेक नेते भेट देऊन गेले, पण कुटुंबाच्या भविष्यासाठी काही ठोस मदत होताना दिसत नाही. आम्ही उघड्यावर पडलो आहोत, कृपया याकडे लक्ष द्या,” असे त्या म्हणाल्या. यावर प्रतिसाद देताना ना. दानवे म्हणाले, “शिवसेना नेहमीच कुटुंबाच्या पाठीशी ठाम आहे. उद्धव ठाकरे साहेब स्वतः हा विषय गांभीर्याने घेतील.”