Happy Birthday Sudhir Mungantiwar : राजकारणातील स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व – सुधीरभाऊ

Happy Birthday Sudhir Mungantiwar : राजकारणातील स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व – सुधीरभाऊ

विनोद राऊत
सध्या राजकारणाचा पट पूर्णपणे बदलून गेला आहे. राजकारणाचा एकमेव केंद्रबिंदू आता सत्ताकारण ठरत आहे. सत्तेसाठी कुठल्याही प्रकारच्या तडजोडी स्वीकारणे ही अत्यंत सामान्य बाब झाली आहे. ‘तत्त्वनिष्ठा’ हा शब्द आता गैरलागू झाले आहे. ‘गिव्ह अँड टेक’च्या या राजकारणात एकदा का तूमची खुर्ची गेली की, तूमच्या आजूबाजूचे लोक अचानक गायब व्हायला लागतात. महाराष्ट्राच्या राजकारणात याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतो. मात्र राजकारणाच्या या निसर्ग नियमाला काही जण अजूनही अपवाद ठरत आहेत. त्यात सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले सुधीर मुनगंटीवार यांचे नाव प्रामुख्याने घेता येईल.

सुधीरभाऊ आता राज्याच्या मंत्रिमंडळात नाहीत. मात्र सत्तेच्या वर्तुळात अजूनही त्यांची चर्चा असते. त्यांच्या शब्दाला वजन आहे. विधानसभा सभागृहात ते जेव्हा बोलायला उभे राहतात, तेव्हा संपूर्ण सभागृह त्यांना शांतपणे ऐकत असतं. सत्तावर्तुळ, विरोधीपक्ष, नोकरशाही असो की सामान्य माणूस, सुधीरभाऊंचा आदर आजही सर्वत्र अबाधित आहे. नवे सरकार आल्यानंतर आतापर्यंत झालेली दोन्ही अधिवेशनं सुधीरभाऊंनी आपल्या वक्तृत्व व अभ्यासू भाषणांनी गाजवली. अर्थ, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री ही महत्त्वाची खाती सुधीरभाऊंनी गेल्या दहा वर्षात हाताळली आहेत. कामाची धडाडी, निर्णयक्षमता व कल्पकतेने ही सर्व खाती त्यांनी गाजवली. राज्याचा शेवटचा शिल्लकी अर्थसंकल्प त्यांच्याच अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात मांडण्यात आला, हे सर्वजण मान्य करतात.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गरजुंना ईव्ही प्रदान !

मनात आणल्यास सरकार काय करु शकते, याची प्रचिती वेळोवेळी सुधीरभाऊंनी आपल्या कामातून दिली आहे. गेल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्यसारखे खाते होते. नट, नट्यांसोबत फोटो काढणे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अवार्ड शोला हजेरी लावणे आणि चित्रपटांचे अनूदान वाटणे एवढेच काम या मंत्रालयाचे असते, असे आतापर्यंत चित्र होते. मात्र या विभागाची सूत्र हाती आल्यावर सुधीरभाऊंनी हे चित्र पालटून टाकले. महाराष्ट्र गीत हे सर्व शासकीय, निमशासकीय समारंभात वाजणे पूर्वी बंधनकारक नव्हते. सुधीरभाऊंनी एक साधा जीआर काढून राज्यगीत सर्वच शासकीय, अशासकीय कार्यक्रमात बंधनकारक केले. आज तुम्ही परदेशी वकालत, सिनेमा थियेटर किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जा, राष्ट्रगीतानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत वाजतं आणि मराठी माणसांचं मन उचंबळून येतं. हा निर्णय घेण्यासाठी काही पैसै लागले नाही. केवळ कल्पकता आणि प्रबळ इच्छाशक्ती लागली. आतापर्यंत महाराष्ट्रात कित्येक सांस्कृतिक मंत्री झाले, मात्र महाराष्ट्राच्या राज्य गीताला सन्मान देण्याची ही कल्पना त्यांना सूचली नाही.

योजना, कल्पकतेच्या बाबतीत सुधीरभाऊ प्रचंड क्रिएटीव्ह व्यक्तिमत्व आहे. चोवीस तास माझ्या डोक्यात बिनखर्चाच्या अनेक कल्पना, योजना सातत्याने येतात, असे ते आम्हाला कायम सांगतात. केवळ कल्पकतेने काम होत नाही, तर त्या योजना प्रत्यक्षात आणण्यापर्यंतचे काम सुधीरभाऊंनी अनेकदा करुन दाखवले आहे. आतापर्यंत निष्क्रिय किंवा कुणाच्या खिजगणतीत नसणारे खाते म्हणून वन खात्याचा लौकिक होता. मात्र जंगल, पर्यावरणाची मनापासून आवड असणाऱ्या सुधीरभाऊंनी एका दशकाच्या काळात वन खाते कुठल्या कुठे नेऊन ठेवले. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या वृक्षलागवड मोहीमेवर भलेही आज आरोप, प्रत्यारोप झाले असतील, मात्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा त्यांनी हा महत्त्वाचा उपक्रम राबवून दाखवला. निव्वळ राबवला नाही तर अनेक संस्था, माणसांना सोबत घेऊन या मोहीमेला जनचळवळीचे स्वरुप दिले. आज वातावरण बदलाच्या युगात वृक्षलागवड मोहीम हा देशभरात अत्यंत महत्त्वाचा विषय ठरला आहे. अनेक राज्यांनी या मोहीमेचे अनुकरण केले आहे.

२०२४ मध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाले. या मंत्रिमंडळात सुधीरभाऊंचे नाव नव्हते. अनेकांसाठी हा धक्का होता. मला भाऊंचा स्वभाव माहिती आहे. सत्तेत असण्याचे किंवा नसण्याचे दुखः त्यांना कधीच नव्हते. मात्र त्यांना आतापर्यंत चंद्रपूर आणि राज्यासाठी जी विकासकामे खेचून आणली होती, त्यातील अनेक कामे आता पूर्णत्त्वाच्या टप्यावर पोहोचली आहे. या कामांना आता खऱ्या पुश-अपची गरज होती. त्याची सल सुधीरभाऊंच्या बोलण्यातून कायम जाणवते.

Maharashtra politics : आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही !

राज्याच्या राजकारणात आपली ओळख निर्माण करण्यासाठी अनेकांना मंत्रिपदाची गरज असते. मात्र मंत्रिपदाशिवाय सुधीरभाऊ जनसामान्यांचे काम त्याच धडाडीने आणि वेगाने करू शकतात, याची जाणीव आमच्यासारख्या असंख्य मित्र, व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना निश्चितच आहे. मला आठवतं सुधीरभाऊ वर्धा जिल्हाचे पालकमंत्री होते. या काळात त्यांनी जिल्ह्यासाठी भरभरुन निधी दिला. मात्र जिल्ह्याच्या अंतर्गत राजकारणात त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. स्पष्ट बोलणे, पारदर्शक राहणे हे कधी काळी राजकारणातले सर्वात चांगले गुण मानले जात होते. मात्र आजच्या बदलत्या युगात ही अत्यंत घातक गोष्ट मानली जाते. मात्र त्यांच्या डीएनएमध्येच हे गुण असल्यामुळे सुधीरभाऊ आजही स्पष्ट बोलतात. छक्के पंजे वापरुन बोलले असते, तर सुधीरभाऊंचे राजकारण आज वेगळ्या टप्यावर असते. मात्र त्यांना ते कधी जमले नाही. राजकीय आयुष्याच्या कुठल्याही टप्यात सुधीरभाऊंनी आपला स्वभाव सोडला नाही. कारण हा मोकळाढोकळा स्वभाव सोडला तर त्यांची खरी घुसमट होईल.

Manikrao Kokate : चांगल्या कामगिरीमुळे माणिकराव कोकाटे यांना अभय?

मंत्रीपद नसतानाही सुधीरभाऊ अधिवेशनाचे नेतृत्व करताना दिसले. कधी कधी विरोधी पक्षनेत्यासारखे सरकारला धारेवर धरताना दिसले तर कधी वडीलकीच्या भूमिकेतून सरकारचे कान धरताना दिसले. विधीमंडळात जनतेचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी सदस्यांना विविध संसदीय आयुधांचा वापर करावा लागतो. त्यात सुधीरभाऊ अत्यंत पारंगत आहेत. मला एका अधिकाऱ्याने सांगितले की विधानसभेत जेव्हा लोकप्रतिनिधींचे प्रश्न सुटत नाहीत तेव्हा विधीमंडळाबाहेरून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एक-एक संसदीय अस्त्र आहे. ते आतापर्यंत केवळ सुधीरभाऊंनी वापरले आहे. केवळ वक्तृत्त्वानेच नव्हे, तर जनतेच्या काळजातील प्रश्न जिव्हाळ्याने मांडून त्यांनी मंत्रिपदाशिवाय फक्त आमदार असतानाही तेवढेच कार्यक्षम असल्याचे सिध्द केले. विधीमंडळात ते अनेक संसदीय अस्त्र प्रभावीपणे वापरतात, कारण त्यांच्या पाठीशी आहे अनुभव, अभ्यास व जनतेबद्दलची तळमळ. जनतेचे प्रश्‍न त्यांनी अधिक निर्भीडपणे मांडले. शेतकरी कर्जमाफी असो किंवा लाडकी बहिण योजना, महिलांचे आरोग्य यासंदर्भात त्यांच्या भूमिकेत तडजोड नसते… असते ते केवळ जनहित. सुधीरभाऊंचे राजकारण केवळ पदासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि म्हणूनच आजही सभागृह त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकतं, कारण त्या शब्दांमागे आहे आस्थेची ताकद…

… (लेखक मुंबईस्थित जेष्ठ पत्रकार आहेत)