Congress President attacks on PM for Water crisis : जलजीवन मिशन पाण्यात ; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पंतप्रधानांवर टीका
Mumbai राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी सरकारची स्थिती आहे. घोषणा मोठमोठ्या होतात प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा केली. २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. योजनाही पाण्यात घातली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार लोकांचे बळी घेत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘हर घर नल आणि हर नल जल, असे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत होते. यासाठी केंद्र व राज्य सरकारने जलजीवन मिशन योजना सुरु केली पण केंद्रीय अर्थमंत्रालयानेच भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करून एका नळाचा खर्च ३० हजारावरून १ लाख ३७ हजारांवर कसा गेला याचे स्पष्टीकरण मागवले आहे.’
Heat Wave : लोकांच्या मागणीला ‘ग्रीन सिग्नल’; दुपारी सिग्नल बंद !
या योजनेचा फायदा फक्त अधिकारी आणि कंत्राटदारांनाच झाला आहे. माता भगिणींना पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक मुलगी पाणी आणण्यासाठी जात असताना तिचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरावे लागते यावरून जलजीवन मिशन भ्रष्टाचाराची बळी ठरली आहे हे स्पष्ट होते. आता तर केंद्र सरकारने या योजनेच्या निधीत ४७ टक्के कपात केली आहे त्यामुळे निधीअभावी कामे होणार नाहीत, अशी भीतीही सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.