Congress state president said, Marathi is the soul of expression: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले,मराठी ही अभिव्यक्तीचा आत्मा !
mumbai : मराठी ही केवळ एक भाषा नाही; ती महाराष्ट्राच्या अस्मितेची, संस्कृतीची, इतिहासाची आणि लोकजीवनाच्या अभिव्यक्तीचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजां पासून महात्मा फुलेंपर्यंत, लोकशाहीच्या चळवळीं पासून सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनां पर्यंत, प्रत्येक टप्प्यावर मराठी भाषेने या भूमीच्या विचारांना आकार दिला आहे.
दुर्दैवाने आज महाराष्ट्रात मराठी भाषेवरच अन्याय सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जबरदस्तीने हिंदी लादण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशावर चालणाऱ्या राज्य सरकारने सुरू केला. मातृभाषेचा अवमान आणि मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर होणारी भाषिक सक्ती केवळ अपमानास्पद नाही, तर ही सांस्कृतिक गुलामगिरी कडे घेऊन जाणारी हिंदी – हिंदू – हिंदू राष्ट्र या उद्देशाने सुरु आहे.
Eknath Shinde : अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे म्हणाले जय गुजरात !
या विरोधात काँग्रेसने सुरुवाती पासून ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतली. विविध सामाजिक-सांस्कृतिक संघटनांसह काँग्रेसने या लढ्यात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. मराठीचा अभिमान, तिचं संवर्धन आणि तिच्या प्रतिष्ठेचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष केवळ आंदोलना पुरता मर्यादित नाही, तर तो दीर्घकालीन, वैचारिक आणि लोकशाही मूल्यांचा लढा आहे.
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचे दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असले, तरी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली नवीन समिती ही सरकारच्या पुन्हा हिंदी लादण्याच्या संभाव्य कटाचा स्पष्ट संकेत आहे.शासन निर्णय मागे घेण्यात आले, हा लढ्यातील पहिला विजय आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी झटणाऱ्या अभ्यासक, सामाजिक संघटना, आणि सर्व मराठीप्रेमी नागरिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन. परंतु, ही लढाई अजून संपलेली नाही.
मराठी ही आपली अभिव्यक्ती आहे, आमची संस्कृती आहे, आणि आमचा आत्मसन्मान आहे. या भूमीचा प्रत्येक कण, प्रेरणा देणारा आहे, प्रत्येक चळवळ ही मराठी भाषेतूनच घडली .त्यामुळे मराठीवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाविरोधात काँग्रेसचा लढा अखंड आणि अविरत राहील.भविष्यातही मराठी भाषेच्या सन्मानासाठी काँग्रेस सदैव तत्पर राहील. मराठी माणूस, मराठी संस्कृती, आणि महाराष्ट्राच्या आत्म्याचे रक्षण हेच आमचे आद्य कर्तव्य राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.