Sadavartes warning, demand to arrest Raj Thackeray : सदावर्तेंचा इशारा, राज ठाकरेंना ताब्यात घेण्याची मागणी
Mumbai : राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे, ‘ठणठण गोपाळ’ आहे. हा मोर्चा मी निघू देणार नाही. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून राज ठाकरे यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी गुणवंत सदावर्ते यांनी केली आहे. राज्यातील शाळांमध्ये पहिली पासून त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे सुरुवातीपासून विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे पण आंदोलनात सहभागी झाले असून ठाकरे बंधू मराठी माणसाचा मोर्चा काढत आहेत, याबद्दल सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा सुत्रीचा वापर आणि हिंदी सक्तीला राज ठाकरे यांनी सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही,त्यामुळे आता मनसेसह विरोधी पक्षातील नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मराठीसाठी एकत्र यावे, असे आवाहन सर्वपक्षीयाना केले.त्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने साद देत मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा निघू देणार नाही, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
सदावर्ते यांनी कायदेशीर भाषेचा दाखला देत, मोर्चा निघू देणार नसल्याचे म्हटले. जे नियम सर्वसामान्यांना आहे, तेच नियम यांनाही लागू असले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटले यावर मला काही बोलायच नाही. पण, ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे बाळ गोपाळांचा मोर्चा आहे. हिंदी रोखणं म्हणजे मुलांच्या शिक्षणाशी खेळण्यासारखं आहे. राज ठाकरे भाषेच्या आणि सांप्रदायिकतेच्या नावावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी वेगळे घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज ठाकरेंना मोर्चासाठी परवानगी नसून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे, अशी भूमिका सदावर्ते यांनी मांडली आहे.
__