Congress state president Harshvardhan Sapkal hits out at BJP and RSS : साहित्यिकांना पत्र लिहून केले आवाहन
Mumbai : पहिल्या वर्गापासून ते चौथ्या वर्गापर्यंत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला, तेव्हापासूनच हा निर्णय रद्द करावा, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे. हिंदी भाषेचा सन्मानच आहे, पण सक्ती खपवून घेणार नाही. जी सक्ती गुजरातमध्ये नाही, ती महाराष्ट्रावर का लादली जात आहे, कुणाच्या हुकूमावरून लादली जात आहे, असे सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघात केला आहे.
मुंबईत आज (ता. २८ जून) पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, मराठी फक्त भाषा नाही, तर आमची जीवनशैली आहे. काही राजकीय पक्ष, संघटना आपापल्या परिने या निर्णयाचा विरोध करत आहेत. या मुद्यावर मी स्वतः साहित्यिकांना पत्र लिहून आवाहन केले आहे. तर काही जण मोर्चा काढत आहेत. हिंदी सक्तीचा विरोध करत हा निर्णय रद्द करावा, हीच सर्वांच्या आंदोलनाची दिशा आहे. हा संस्कृतिचा लढा आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन लढले पाहिजे. कुणाचा कॉल किंवा निमंत्रण आले किंवा नाही, हे महत्वाचे नाही. आम्ही पहिलेपासूनच हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात लढा देत आहोत.
आठव्या सुचीतील सर्व भाषा संपवून केवळ हिंदी ही एकच भाषा ठेवायची हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा कुटील डाव आहे. आम्ही मराठीचा गळा दाबू देणार नाही, हा कुटील डाव हाणून पाडू, असा इशाराही सपकाळ यांनी दिला. गुजरातमध्ये एक निती आणि महाराष्ट्रात दुसरी निती कशी, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन सपकाळ यांनी केले. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे गोळवलकर यांच्या बंच ऑफ थॉटबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.