MP Amar Kale said that the citizens of both countries do not want war : पहलगामच्या हल्ल्यात आपल्या सुरक्षा यंत्रणेचं अपयश दिसलं
Nagpur : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पण काल (७ मे) भल्या पहाटे भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानमधील कोणत्याही पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या नाहीत. पण आताही पाकिस्ताने आपल्या दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्यांचे याहीपेक्षा खराब हाल होतील, असे खासदार अमर काळे यांनी म्हटले आहे.
नागपुरात आज (८ मे) खासदार काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांना झळ पोहोचलेली नाही. खरे पाहता दोन्ही देशांतील सामान्य नागरिकांना युद्ध नको आहे. युद्धामध्ये आपल्या देशाच्याही आर्थिक व्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे युद्ध छेडण्यापूर्वी त्याचाही विचार केला गेला पाहिजे. जेवढं आवश्यक होतं, तेवढं उत्तर पाकिस्तानला मिळालेलं आहे.
Elimination of terrorists : दहशतवाद्यांचा खात्मा आणि स्वाभीमानासाठी काँग्रेसचं समर्थन !
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, पृथ्वीराज चव्हाण काय बोलले, हे मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर मी वक्तव्य करणार नाही. देशावर हल्ला झाला आहे. त्याचे उत्तर आपण दिले आहे. आम्ही देशासोबत आहोत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, त्यामध्ये आपल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्रुटी दिसून आल्या, त्याबाबतही आपण विचार केला पाहिजे, असे खासदार अमर काळे यांनी सांगितले.