Breaking

Kapshi road Grampanchayat : महिलांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतने लावले सीसीटीव्ही!

Gram Panchayat installs CCTV for women’s safety : गावात सौरऊर्जेवरील दिवे; कापशीने घालून दिला आदर्श

Akola महिलांच्या सुरक्षेच्या नावाने निव्वळ घोषणांचा डोंगर रचला जात आहे. मोठमोठाल्या शहरांमध्ये अजूनही महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अशात कापशीसारख्या एका छोट्या गावात ग्रामपंचायतने आदर्श घालून देणारे काम केले आहे. अख्ख्या गावात महिलांच्या सुरक्षेसाठी १४ CCTV कॅमेरांचे जाळे उभे करण्यात आले आहे.

सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला असताना, कापशी रोड ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वीच प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यावर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात स्क्रीन बसवण्यात आला आहे. तसेच, सौरऊर्जेवर चालणारे हायमास्ट दिवे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वीज गेल्यावरही गावातील हे दिवे सुरू राहतात.

MIDC Amravati : उद्योजकांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली!

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अकोला शहरातही गुन्हेगारी रोखण्यासाठी हा उपाय केला जात आहे. मात्र, कापशी रोड ग्रामपंचायतीने महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी दोन वर्षांपूर्वीच हे पाऊल उचलले होते.

गावात १४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. यासाठी अडीच लाख रुपये खर्च करण्यात आले. या कॅमेऱ्यांमुळे बसस्थानक तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी मद्यपींच्या त्रासालाही आळा बसला आहे. बँक, ग्रामपंचायत, शाळा आणि अंगणवाडीमार्गावरही हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

काही वर्षांपूर्वी एका महिलेवर गावात अत्याचार झाला होता. त्यानंतर ग्रामपंचायतने महिला, विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्ही बसवल्यास गुन्हेगारांना पकडले जाण्याची भीती वाटेल. आणि ते गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील. असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गावातील गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे, हे विशेष

Chandrashekhar Bawankule : पाणी टंचाईची ओरड नको, ठरलेल्या वेळेत कामे करा!

महिला सुरक्षेबरोबरच कापशी ग्रामपंचायत ग्राम स्वच्छतेतही पुढे आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात अमरावती विभागातून दुसरा आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या गावात एकूण ५२९ घरं असून लोकसंख्या 2,400 आहे. अकोल्यापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सरपंच वेणूताई उमाळे यांच्या नेतृत्वात सांडपाण्यावर प्रक्रिया; पाणी पुनर्वापराची योजनाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

गावात 2,000 मीटर भूमिगत ड्रेनेज लाईन टाकण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 1,800 मीटरपर्यंत काम पूर्ण झाले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते 20 हेक्टर शेतीसाठी पुनर्वापरात आणले जात आहे. कापशी फक्त महिला सुरक्षेत पुढे नसून, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांमध्येही आदर्श ठरत आहे, हे विशेष.