Cancel the contracts of substandard food suppliers : महाराष्ट्र महिला बचत गट संघटनेची मागणी; प्रधान सचिवांना लिहिले पत्र
Nagpur‘हिंगणा आयटी चौक परिसरातील राजनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात अनियमित आणि निकृष्ट प्रतिचा भोजनपुरवठा करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करावे’, अशी मागणी महाराष्ट्र महिला बचत गट संघटनेकडून करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांनाही याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे.
ब्रिक्स कैलाश फूड या कंपनीला राज्यभरातील वसतिगृहाला भोजन पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार नियमित आहार उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना दूध, दही, कॉर्न फ्लेक्स असा पोषक आहार मिळावा, असेही करारात नमूद आहे. मात्र विद्यार्थ्यांना आहार मिळत नसल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाकडे केली. विद्यार्थ्यांना पूर्ण भोजन देणे हे कंत्राटदाराचे काम आहे. विद्यार्थ्यांना भोजन मिळते, मात्र त्यात गुणवत्ता नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यापूर्वीही (सप्टेंबर २०२४ मध्ये) एक लाख रुपयांचा दंड याच कंपनीला झाला असल्याचे समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
करारानुसार विद्यार्थ्यांना भोजनपुरवठा होत नसल्याने या कंपनीला काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करावे. कंत्राट रद्द केले नाही तर जनआंदोलन उभे करण्याचा इशारा बचत गट संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला. विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्याचे काम राज्यातील महिला बचत गटांना देण्यात यावे, अशी मागणीही या पत्राच्या माध्यमातून संजय जीवने, सुषमा भोवते, दिनेश ताणवे यांनी केली.