Hundreds of Workers Join the BJP : अकोल्यातील सोहळ्यानंतर मित्र पक्षांपुढे प्रश्न, निवडणुका जिंकण्याचा विश्वास
Akola खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर भाजपच्या नेत्यांनी महायुतीच निवडणुका जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. पण इनकमिंग भाजपमध्ये होत असताना महायुतीमधील मित्र पक्षांना त्याचा काय फायदा होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे. जनतेसोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर अधिक दृढ होत आहे, असे सावरकर म्हणाले आहेत. परंतु, खरे चित्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
खासदार अनुप धोत्रे देखील यावेळी उपस्थित होते.या वेळी रामगाव पंचकोशी परिसरातील अंकुश नारायणराव दौड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र देवर आणि संजय गावंडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, नितीन पावसाळे, भूषण लोणंद, मंगेश पाटेकर, राहुल विखे, अनिकेत धोत्रे, चैतन्य लोणंद, जितेंद्र दौड, विजय दौड, निखिल पावसाळे, ऋतिक धोत्रे, अभिषेक पाटेकर आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी या प्रसंगी भाजपा प्रवेश केला.
सावरकर म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या श्रमांवर उभा असलेला पक्ष आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानाचा सन्मान राखला जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीचा विजय निश्चित असून, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पक्षाचा झेंडा प्रत्येक गावात फडकणार आहे.” विशेष म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल असे म्हणताना उमेदवारी देण्याचे आव्हान देखील भाजपच्या नेत्यांनी स्वीकारले असावे, असे बोलले जात आहे.








