BJP leader Babanrao Lonikar presented his side and Shambhuraj Desai recovered : पिंपळाचं पान पडलं अन् हे म्हणतात पिंपळाचं झाड जळालं
Mumbai : भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य केले. त्यावरून विरोधकांनी रान उठवलं. लोणीकरांनी माफी मागावी, अशी मागणी राज्यभरातून जोर धरू लागली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तर त्यांना अक्षरशः धारेवर धरलं. अशात आज (२ जुलै) लोणीकरांनी विधानसभेत आपली बाजू मांडली. त्यांना शंभुराज देसाई यांनी चांगलीच साथ दिली.
सभागृहात आपली भूमिका मांडताना बबनराव लोणीकर म्हणाले, मी जे बोललोच नाही, ते विरोधी पक्षातील लोक सांगत फिरत आहेत. गेली ४० वर्ष मी राजकारणात आहे. शेतकऱ्यांचे २५ – २५ हजार संख्येचे मोर्चे त्यांच्या प्रश्नांसाठी काढलेले आहेत. अनेत विषयांत त्यांना न्याय मिळवून दिला आहे. अन् अचानक मी शेतकरी विरोधी झालो का, असा प्रश्न कुणालाही का पडत नाहीये? विरोधकांना यामध्ये केवळ राजकारण करायचं आहे.
पुढची १०० वर्ष माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी हाडंसुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात मी बोललोच नाही. काही लोक मुद्दामहून याचं राजकारण करत आहेत. मी कुण्यातरी विशीष्ट लोकांना उद्देशून ते बोललो होतो. पण भलतंच काही पसरवण्यात आलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाटत असेल तर मी एक नाही, तर हजार वेळा त्यांची माफी मागायला तयार आहे. पण यांची माफी मागणार नाही, असे लोणीकरांनी ठणकावून सांगितले. येथे पिंपळाचं पान पडलं, अन् हे म्हणतात झाड जळालं, असा हा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.
Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार !
यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले की, विरोधी पक्षाच्या सदस्यांना विनंती आहे की , सरकारची भूमिका समजावून घ्यावी. बबनराव लोणीकरांचं वक्तव्य टीव्हीवर आलं. त्याबाबत आज त्यांनी खुलासा केला. ते येवढ्या पोटतिडकीनं सांगत आहेत. काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर ते माफीही मागायला तयार आहेत. ते ज्या व्यक्तीला उद्देशून बोलले, ते तोडून मोडून शेतकऱ्यांशी जोडले गेले. तरीही त्यांनी माफी मागितली आहे आणि रेकॉर्डवर आहे. विरोधकांनी कृपया राजकीय भांडवल करू नये.