There is such a difference between the government’s words and actions, Congress leader Nana Patole has a question : कॅबिनेटने निर्णय घेतल्यानंतर कर्जमाफी देण्यात आता कसली अडचण?
Mumbai : सरकार स्वतःच दिलेला शब्द पूर्ण करत नाही. याचा अनुभव आतापर्यंत राज्यातील जनतेने घेतला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडक्या बहीणींना २१०० रुपये देण्याचे वचन महायुती सरकारने अद्याप पूर्ण केलेले नाही. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज सभागृहात सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये मोठा फरक आहे, असे पटोले म्हणाले.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, पाणी वापर संस्थांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्याचा उल्लेख त्यांना करायला लावला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीतही असाच प्रकार केला. पण अद्याप सरकारने ते कर्ज माफ केलेले नाही. मंत्री महोदय सांगतात की, पुन्हा व्याजाच्या रकमेची तडजोड करावी लागेल. यामध्ये रिझर्व बॅंक ऑफ इंडिया आडवी येते. सरकारच्या उत्तरानुसार हे स्पष्ट आहे की, सरकार शेतकऱ्यांसोबतही खोटे बोलले. राज्यपालांच्या तोंडून बोलवून घेतलं आणि फसवेगिरी केली. आता सरकार कर्जमाफीचे धोरण पूर्ण करणार का? शेतकऱ्यांची चेष्ठा थांबवणार का, असे प्रश्न त्यांनी केले.
या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनीही सहभाग घेतला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या आधी हा निर्णय झाला होता, हे विनय कोरे यांनी आधीच सांगितले आहे. नियोजन व वित्त विभागाने काय म्हटले, हा विषय येथे येत नाही. कारण सरकारचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे ३५० कोटी रुपयांचे प्रयोजन पुरवणी मागण्यात करणार का? आरबीआय यामध्ये कधीच हस्तक्षेप करत नाही. कारण शरद पवारांनी देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, ती केंद्र सरकारने दिली. बॅंकेतून दिली नाही. त्यामुळे आता मुद्दा असा आहे की ही ३५० कोटींची रक्कम सरकार मंजूर करणार का? यावर मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्याजाला मंजुरी घ्यावी लागेल, असे मोघम उत्तर दिले.