Farmers are suffering due to lack of electricity : सडक अर्जुनीत शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा
Gondia सडक अर्जुनी उन्हाच्या कडाक्यात वीज नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. पाणी नाही, शेती नाही, आणि तरीही महावितरण गप्प आहे. यासंदर्भात सतत तक्रारी केल्यानंतरही काहीच हालचाल झाली नाही. अखेर शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
“पाच दिवसांत विजेचा दाब सुरळीत नाही झाला, तर मोठे आंदोलन करू,” असा थेट इशारा आंदोलकांनी दिला आहे. तालुक्यातील खजरी, चिरचाढी आणि रेंगेपार या भागांमध्ये विजेचा दाब अत्यंत कमी आहे. परिणामी पिण्याचे पाणी मिळत नाही, शेतकऱ्यांचे पंप चालत नाहीत आणि शेती करणे अशक्य झाले आहे. याबाबत अनेकदा निवेदने दिली गेली, परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले.
५ मार्च रोजी आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, २२ दिवस उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे.
बुधवारी शेतकऱ्यांनी सहायक अभियंता रेवतकर यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर मुख्य अभियंता फुलझेले यांना तातडीने बोलविण्यात आले. आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि काही तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
गौरेश बाचनकर, किशोर डोंगरवार, प्रशांत झिंगरे, राजेश कापगते, जगदीश डोंगसवार आणि रेंगेपार गावाच्या सरपंचांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “पाच दिवसांत विजेचा प्रश्न सुटला नाही, तर आम्ही मोठे आंदोलन करू. मग कोणत्याही अधिकाऱ्याला खुर्ची टिकवता येणार नाही!”
Nagpur riots : मुख्यमंत्र्यांनी घेतला यू-टर्न, नासीर खान यांचा आरोप
या आहेत मागण्या
आमगाव उपकेंद्र बंद असल्याने मोहाडी येथून वळवलेली वीज बंद करावी. शेती आणि पिण्यासाठी पुरेसा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. संपूर्ण क्षेत्रातील विजेचा दाब कायमस्वरूपी वाढवावा, या मागण्या करण्यात आल्या आहेत. महावितरणने काही मागण्या तत्काळ मान्य करताच आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु शेतकऱ्यांचा संघर्ष संपलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.