Four crore Marathas will come to Mumbai, Manoj Jaranges big claim : चार कोटी मराठे मुंबईला येतील, मनोज जरांगेंचा मोठा दावा,
Parbhani : 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसर्या दिवशी आरक्षणाचा गुलाल अंगावर पडलाच समजा. यावेळी तीन ते चार कोटी मराठे मुंबईला येतील, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. जरांगे यांच्याकडून रात्री उशिरा परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील धारसुर येथे पारावरची चावडी बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी आता आरपारची लढाईची घोषणा केली. गेल्या महिन्यात अंतरवाली सराटीत बैठक झाली. त्यात त्यांनी मुंबईमध्ये आंदोलनाची घोषणा केली. मराठा समाजाला कोणीही रोखू शकत नाही. आता विजयाचा गुलाल घेऊनच यायचे असे आवाहन त्यांनी समाजाला केले. 27 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटी येथून मोर्चा निघेल. तो 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकेल. अंतरवाली सराटी येथून शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर आणि पुढे मंत्रालयावर हा मोर्चा जाणार आहे. मोर्चासाठी पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक आणि पुढे मुंबई या पर्यायी मार्गावरही विचार सुरू आहे.
मोर्चात राज्यभरातून लाखोच्या संख्येने समाज रस्त्यावर उतरेल अशी माहिती त्यांनी दिली. या मोर्चाच्या दृष्टीने राज्यात विविध ठिकाणी चावडी बैठका घेण्यात येत आहेत. मनोज जरांगे हे अनेक जिल्ह्यात चावडी बैठका घेत आहेत. यावेळी मुंबईत 3 ते 4 कोटी मराठे येतील अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा हाक दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा ताप वाढणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.