Women have to walk long distances to get a pot of water : पाणीटंचाईवर गाजली पंचायत समितीची सभा, आमदार आक्रमक
Buldhana देऊळगावराजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागत आहे. शासनाने पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले असले, तरी अनेक ठिकाणी या योजना कागदावरच राहिल्या आहेत. काही ठिकाणी भ्रष्टाचारामुळे या योजना अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पाणीटंचाईच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा आमदार मनोज कायंदे यांनी दिला. पंचायत समितीच्या वार्षिक आमसभा व सरपंच मेळाव्यात ते बोलत होते. आमसभेत अनेक गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला सरपंचांनी अनुपस्थिती दर्शवली. मात्र, त्यांच्या नावाने आलेल्या काही पुरुष प्रतिनिधींनी सभेत हजेरी लावल्याचे चित्र होते.
महत्त्वाच्या सभेत अनेक अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. तसेच, उपस्थित काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती सादर केली. ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी नागरे यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे उघड होताच, गणेश नागरे (बायगाव) यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. आमसभेत स्वच्छ भारत मिशन, कृषी, रोजगार हमी योजना, शिक्षण, बांधकाम, पाणीटंचाई, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य व सामाजिक विभागांच्या विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.
Prashant Padole : समृद्धी महामार्गासाठी गरज असेल तेवढीच जमीन घ्या!
या वेळी विविध पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या सरपंच, सचिव, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी मुकेश माहोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले.